पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा
श्री विठ्ठलाचे दर्शन घेताना नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबतची बातमी मला पत्नीकडून समजली. पालकमंत्रीपदी निवड झाल्याने मला विठ्ठलच पावला, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
मंत्री महाजन यांनी सोमवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, आषाढी वारी काळात मी पंढरपुरात उपस्थित राहून सेवा बजावली आहे.
मतदारसंघातील भाविकांची सेवा बजावत आहे. त्याचेच फळ मला विठ्ठलाने दिले आहे. योगायोग बघा, सोमवारी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जवळपास १५-१६ हजार भाविकांबरोबर आलो आहे. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत असताना नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून निवड झाली.
राज्यात १७ महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. यात एकही महापालिका ठाकरे-राऊत यांना जिंकता आली नाही. त्यांचा एकही जिल्हा परिषद अध्यक्ष नाही. आहेत ते खासदार, आमदार त्यांना सोडून गेले.
जात आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय कामे केली हे बाहेर काढायला लावू नका. लोकांनी तुम्हाला दूर केले आहे. खा. संजय राऊत यांच्या बडबडीला लोक कंटाळले आहेत. राऊत यांच्या जिभेला हाड नाही. ते वायफळ बडबड करतात, अशी टीकाही मंत्री महाजन यांनी केली.
यंदाचा कुंभमेळा ऐतिहासिक होईल. गतवेळेस अडीच कोटी भाविक आले होते. यावेळेस दहा कोटी भाविक येतील, असे नियोजन करण्यात येत आहे. कुंभमेळामंत्री मी होतोच. पण, पालकमंत्री पदामुळे आता कुंभमेळ्याचे नियोजन अधिक चांगले होईल, असेही मंत्री महाजन म्हणाले.