सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) जाणार्या लोकलचा डबा शुक्रवारी (दि. 18) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घसरला. या घटनेचा मुंबईहून सोलापूरकडे येणार्या सर्वच गाड्यांवर परिणाम झाला. यात मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर, मुंबई-चेन्नई या गाड्यांना साडेतीन ते पावणे चार तास, मुंबई-होसपेट दीड तास तर मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेस तब्बल अडीच तास सोलापूरला उशिराने पोहचल्याने प्रवाशांचे हाल झाले.
दरम्यान, कल्याण स्थानकातून मुंबईकडे निघालेल्या लोकलचा डबा घसरल्याने फलाटावर प्रवाशांचा गोंधळ उडाला. या घटनेमुळे मुंबई स्थानकात सोलापूरकर प्रवासी अडकून पडले. यापूर्वी देखील अनेकदा रुळावरून लोकल, मेल, एक्स्प्रेस तसेच मालवाहतूक गाड्या घसरल्याच्या घटना घडल्या आहेत. लोकलचा डबा घसरल्याने मेल, एक्स्प्रेस गाड्या त्या-त्या ठिकाणी थांबविण्यात आल्या तर काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आल्या.