सोलापूर : शहरातील संभाव्य दोन उड्डाण पुलांसाठी केंद्र सरकारच्या मालकीच्या काही जागांचे संपादन करावे लागणार आहे. मात्र, त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणे झाले, पण स्थानिक लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा गरजेचा असल्याचेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
उड्डाणपुलांसाठी एप्रिल महिन्यात 966.24 कोटींच्या निधीला मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ‘एक्स’वरून दिली. केंद्रीय समितीमध्ये सोलापूरच्या या सुधारित प्रस्तावास अंतिम मान्यता मिळाली. मे अखेर भूसंपादनाचे काम पूर्ण करून नवीन निविदा काढली जाणार होती. परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीअभावी हा विषय रखडल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
सोलापूर शहरासाठी जुना पुणे नाका ते पत्रकार भवन तसेच जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे दोन उड्डाणपूल मंजूर होऊन नऊ वर्षे उलटली. जुना पुुणे नाका ते पत्रकार भवन 5.45 किलोमीटर (फेज वन), जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला पाच किलोमीटर (फेज टू) अशा दोन उड्डाणपुलांचा समावेश होता. यामध्ये एकूण 133 मिळकती बाधित होणार होत्या. फेज वनच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, फेज दोनमधील बाधित होणार्या शासकीय कार्यालयांनी अद्याप जागा ताब्यात दिल्या नसल्याने दोन उड्डाणपुलांचा प्रस्ताव रखडला आहे.