Balasaheb Sarvade Murder Case 
सोलापूर

Balasaheb Sarvade Murder Case | सत्तेसाठी एका कुटुंबाचा बळी; सरवदे यांच्या हत्येनंतर दोन चिमुकल्या मुलींचे भविष्य अंधारात, शासनाने जबाबदारी घ्यावी

Balasaheb Sarvade Murder Case | सोलापूर येथील सहकारी बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येने केवळ त्यांच्या कुटुंबालाच नव्हे, तर संपूर्ण समाजमनाला हादरवून सोडले आहे.

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर येथील सहकारी बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येने केवळ त्यांच्या कुटुंबालाच नव्हे, तर संपूर्ण समाजमनाला हादरवून सोडले आहे. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाची अवस्था पाहून अनेकांचे मन अजूनही अस्वस्थ असून, राजकारण किती निर्दयी आणि माणुसकीपासून दूर गेले आहे, याचे हे जिवंत उदाहरण असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विशेषतः ज्या दोन चिमुकल्या मुलींनी आपल्या लहानशा हातांनी वडिलांचे अस्थी-विसर्जन केले, त्या दृश्याने उपस्थितांचे डोळे पाणावले आणि त्यांच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

बाळासाहेब सरवदे हे कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अचानक आणि हिंसक मृत्यूमुळे त्यांच्या पत्नीवर आणि दोन लहान मुलींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांचे छत्र हरपलेल्या त्या मुलींच्या भविष्यातील शिक्षण, सुरक्षितता आणि आयुष्याचा विचार करताना अनेकांच्या अंगावर काटा उभा राहत आहे. एका राजकीय संघर्षातून एका निष्पाप कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होणे, ही बाब अत्यंत वेदनादायक असल्याचे सहकारी आणि नागरिक सांगत आहेत.

सत्तेसाठी आणि राजकीय वर्चस्वासाठी अशा प्रकारे एखाद्याचा जीव जाणे, ही महाराष्ट्राच्या राजकारणाची अधोगती असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. राजकारण हे लोकसेवेसाठी असावे, मात्र जेव्हा ते हिंसाचार, सूड आणि हत्येपर्यंत पोहोचते, तेव्हा समाजाला आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण होते. राजकारण आपल्या जागी असू शकते, पण माणुसकी विसरून चालणार नाही, अशी भावना या घटनेनंतर ठळकपणे व्यक्त होत आहे.

बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे निराश न होता, सहकाऱ्यांनी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे नम्र विनंती आणि आग्रहाची मागणी केली आहे.

या पत्रामध्ये बाळासाहेब सरवदे यांच्या दोन मुलींच्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी शासनाने उचलावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. केवळ आर्थिक मदत नव्हे, तर त्यांच्या शिक्षणापासून ते सुरक्षित भविष्यासाठी आवश्यक सर्व सुविधा शासनाने पुरवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या मुलींना न्याय मिळणे म्हणजे केवळ एका कुटुंबाला आधार देणे नव्हे, तर समाजाला योग्य संदेश देणे असल्याचे सहकाऱ्यांचे मत आहे.

यासोबतच, या हत्येप्रकरणातील गुन्हेगारांना इतकी कठोर शिक्षा द्यावी, की भविष्यात पुन्हा कोणाचीही अशी हिंमत होणार नाही, अशीही मागणी करण्यात आली आहे. कायद्याचा धाक निर्माण झाला नाही, तर अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील, असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे.

भविष्यात राजकारणात अशा प्रकारे निष्पाप बळी जाऊ नयेत, याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांनीच घ्यायला हवी, असेही या मागणीत स्पष्ट करण्यात आले आहे. ही लढाई केवळ सत्तेची किंवा पक्षीय राजकारणाची नाही, तर माणुसकी आणि न्यायासाठीची लढाई आहे. बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय समाजाचे मन शांत होणार नाही, अशी भावना या घटनेनंतर सर्वत्र व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT