Pandharpur Shree Vitthal Temple
पंढरपूरमध्ये भाविकांना अल्पदरात मिळणार भोजन आहे. Pudhari News Network
सोलापूर

पंढरपूरमध्ये भाविकांना अल्पदरात मिळणार भोजन

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे. जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर मंदिर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे. यामुळे भाविकांना आता अल्पदरात नाश्ता व जेवन मिळणार आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येणार्‍या भाविकांना चांगली सुविधा देण्यात येत आहे. त्यामुळे मंदिर समितीने उभारलेल्या भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी भाविकांचा ओढा असतो. अतिशय भव्य स्वरूपात उभारलेल्या या विविध भक्तनिवासांमध्ये असलेल्या 364 रुममध्ये जवळपास दररोज 1500 भाविक निवास करू शकतात. अतिशय आलिशान पद्धतीने उभारलेले नवीन भक्त निवास तर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

या भक्त निवासामध्ये देशभरातून येणार्‍या भाविकांना चांगल्या प्रतीचा चहा, नाश्ता, भोजन मिळावे. यासाठी या हॉटेलचा ठेका देण्यात आला होता. मात्र, जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर मंदिर समितीने भाविकांना अल्पदरात भोजन देण्यासाठी हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे. शुक्रवार पासून याची सुरुवात झाली आहे. भाविक येथील अल्पदरात मिळणार्‍या आणि चांगल्या प्रतीच्या खाद्यपदार्थावर खुश आहेत. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड हे सर्व सुविधांकडे लक्ष ठेवून आहेत.

आषाढी वारी एकादशीचा मुख्य सोहळा दि. 17 रोजी आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविक दाखल होण्यास सुरुवात देखील झाली आहे. या वारीला संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. या पालखी सोहळ्याबरोबर लाखो वारकरी आहेत. सर्व वारकरी हरीनामाच्या गजरात तल्लीन असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दर्शन रांगेतील भाविकांना दशमी, एकादशी आणि व्दादशी या दिवशी मोफत चहा, मिनरल वॉटर, खिचडी वाटप करण्यात येणार आहे. तर संत तुकाराम भवन येथील अन्नक्षेत्रात दररोज दोन वेळेस अन्नदान करण्यात येत आहे. याचाही लाभ भाविक घेत आहेत.

ठळक मुद्दे...

  • भक्तनिवास येथे मंदिर समितीकडून अल्पदरात भोजनाची सुविधा.

  • उच्च प्रतिचा चहा, नाश्ता, भोजन मिळणार.

  • जेवणाची थाळी केवळ 100 रुपयांत.

  • भाविकांच्या खिशाला कात्री लागणे झाले बंद.

  • विठ्ठल अन्नक्षेत्रात दररोज दोन वेळेस अन्नदान.

  • दर्शन रांगेतील भाविकांनादेखील चहा पाणी, खिचडीचे वाटप

SCROLL FOR NEXT