कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे चार फुटांनी उचलून व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 21,050 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.  Pudhari Photo
सातारा

‘कोयना’चे दरवाजे चार फुटांनी उचलले

कोयना नदीपत्रात प्रतिसेकंद 21,050 क्युसेक पाण्याचा विसर्ग

पुढारी वृत्तसेवा

पाटण : पुढारी वृत्तसेवा

पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन गुरुवारी सायंकाळी कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे पहिल्यांदा दीड फुटाने तर सायंकाळी सात वाजता चार फुटांनी उचलून त्यातून 20 हजार व पायथा वीजगृहातील 20 मेगॅवॅट क्षमतेच्या एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 1,050 असे एकूण 21,050 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडले आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने नदीकाठची गावे, लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. धरणात 78.29 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

पावसाचा जोर आणि धरणात पाण्याची आवक वाढली तर त्याचपटीत धरणातून जादा पाणी सोडण्यात येणार असल्याची माहितीही धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस पडत असून छोट्या नद्या, नाले, ओढ्यांमधून प्रतिसेकंद सरासरी तब्बल

85,937 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणात सध्या 78.29 टीएमसी उपलब्ध असून मागील चोवीस तासात धरण पाणीसाठ्यात 7.33 टीएमसीने वाढ झाली आहे. बुधवार सायंकाळी पाच ते गुरुवार सायंकाळी पाच या चोवीस तासात व आजपर्यंतचा एकूण पाऊस कोयना 186 मि.मी.( 3147 ), नवजा 201 मि.मी. (3692 ), महाबळेश्वर मि.मी.294 (3185) पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, पाटण तालुक्यातील कोयना, मोरणा गुरेघर, वांग मराठवाडी, निवकणे, साखरी बीबी आदी छोट्या-मोठ्या धरणांतर्गत विभागातही सध्या मुसळधार पाऊस पडत असून कोयनेसह स्थानिक नद्या, नाले, ओढ्यांच्या पाणी पातळीत धोकादायक वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी नद्या, ओढ्यांचे पाणी आजूबाजूच्या लोकवस्ती व शेतीमध्ये घुसल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूल व संबंधित सर्व यंत्रणा सज्ज असून आपत्तीच्या ठिकाणी तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही तहसिलदार अनंत गुरव यांनी दिल्या आहेत. प्रशासनाकडून याबाबत सतर्कता व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

गृह विभागाच्या बोटीमुळे पाणी सोडण्यास विलंब

गुरुवारी दुपारी चार वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलून त्यातून पाणी सोडण्यात येणार होते. मात्र धरणांतर्गत विभागात सोसाट्याचा वारा व पावसामुळे आतल्या बाजूला असणारी गृह विभागाची बोट अचानकपणे धरणाच्या भिंतीजवळ आल्याने संभाव्य कोणताही धोका नको म्हणून धरण व्यवस्थापनाकडून चार ऐवजी पाच वाजता धरण दरवाजे उचलून त्यातून पूर्वेकडे पाणी सोडण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT