सातारा : गेल्या काही दिवसांपासून नुसतेच आभाळ काळवंडून जात आहे. मंगळवारी दुपारी सातारा, जावली, महाबळेश्वर तालुक्यांत अडखळणार्या मान्सूनच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे शेतकर्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. पावसाला जोर नसला, तरी हा पाऊस पिकांना फायदेशीर असल्याने शेतकरी खूश झाला. मंगळवारी हवामान विभागाने घाट क्षेत्रात दोन दिवस यलो अलर्ट दिला आहे.
सातारा शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यामुळे खरीप पेरणीला वेग आला होता. खरीप हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाने पूर्णत: उघडीप दिल्याने कडक ऊन पडले होते. त्यामुळे काही ठिकाणी धूळवाफेवर पेरणी केलेली पिके उगवली होती. पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मंगळवारी दुपारी 2 वाजल्यापासून सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या. सायंकाळच्या वेळी पावसाने जोर पकडला. मंगळवारी सायंकाळपर्यंत सातार्यात 2.1 मि.मी. तर महाबळेश्वरमध्ये 19.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. कोयना धरण परिसरात 15 मि.मी. , नवजा परिसरात 10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.