साऊंड सिस्टिम 
सातारा

सातारा : हळू वाजव डीजे, तुला आईची शपथ हाय!

पुढारी वृत्तसेवा

सातारा : गणेशोत्सवाची आज सांगता होत असून, मुख्य विसर्जन मिरवणूक पार पडत आहे. आज होणार्‍या मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. या मंडळाने आवाजावर निर्बंध घातले आहेत. तसेच प्रमाणित डेसिबलपेक्षा आवाज वाढवल्यास संबंधितांविरुध्द कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

गणेशोत्सव मंडळांच्या मंडपातील ध्वनिक्षेपकावर पूर्वीच्या तुलनेत बरीच मर्यादा आली असली तरीही गणरायाची स्थापना आणि विसर्जनाच्या दिवशी डीजेमधून निघणारा कर्णकर्कश आवाज अजूनही निघतोच आहे. पोलिसांनी यंदा मात्र या आवाजाला चाप लावला आहे. त्याचबरोबर कानठळ्या बसवणार्‍या या आवाजावर नियंत्रण आणण्यासाठी ध्वनी प्रदूषण अधिनियम तयार करण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत वेळोवेळी सणाच्यावेळी होणारे प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. पर्यावरण विषयक विविध कायदे व त्या कायद्यांची अंमलबजावणी केली जात आहे.

ध्वनिक्षेपकाबाबतही पोलिसांनी गणेश मंडळांना सक्त सूचनाही दिल्या आहेत. आवाजाचे उल्लंघन झाल्यास मंडळावर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही गणेशोत्सव मंडळांनी शांततेत गणरायाची मिरवणूक काढली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन जिल्ह्यातील निवडक मंडळेच करत असतात. काही मंडळांकडून निर्बंधाचे पालन केले जात नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही विसर्जन कालावधीत ध्वनी प्रदूषण जागरूकता अभियानाचे आयोजन केले आहेे.

गणेशोत्सव मंडळांनी जल, हवा, ध्वनी प्रदूषण होणार नाही व पर्यावरणाचे संरक्षण तसेच संवर्धन व्हावे अशा पध्दतीने विसर्जना मिरवणुका काढाव्यात.
अमोल सातपुते, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT