तासवडे टोलनाका : तासवडे एमआयडीसी आणि वराडे यादरम्यान पिढ्यानपिढ्या नैसर्गिक वाहत असणाऱ्या ओढ्यावर अतिक्रमण करून ओढा अडवत वाढेकरबंधूंनी व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे ओढ्याचे पाणी तुंबून शेजारील स्थानिकांच्या अनेक हॉटेल्समध्ये घुसले असून हॉटेलमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे स्थानिक हॉटेलचालकांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा आरोप तासवडे टोलनाक्यावरील स्थानिक हॉटेल चालकांनी केला आहे. तरी तहसीलदार, तळबीड पोलीस आणि महामार्ग प्राधिकरणाने वाढेकरबंधूंवर तत्काळ कारवाई करावी आणि पूर्ववत ओढा करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
हॉटेल सुरू करताना वाढेकरबंधूंनी महामार्ग प्राधिकरण, टोलप्रशासन किंवा एमआयडीसी यांची कोणतीही परवानगी न घेता सुरू केले आहे, असा आरोप होत आहे. वाढेकरबंधूंनी बांधलेल्या जागेबाबत रोजच नवनवीन वादग्रस्त प्रकरणे बाहेर येत आहेत. वाढेकर बंधूंनी एमआयडीसीच्या जागेत अतिक्रमण केल्याचे मोजणीद्वारे सिद्ध झाले असून त्यांना अतिक्रमण काढण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी वाढेकरबंधूंनी हॉटेल बांधत असताना तासवडे एमआयडीसी आणि वराडे या दरम्यान पिढ्यानपिढ्या नैसर्गिक रित्या वाहत असणाऱ्या ओढ्यावर अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी रात्रीत काम करत शेकडो मुरमाचे डंपर ओतून ओढा अडवला आहे. त्यानंतर ओढा अडवल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी चार महिन्यांपूर्वी १०० लोकांच्या सह्या घेत वराडे ग्रामपंचायतीला याबाबत निवेदन दिले होते. तरीही आजपर्यंत याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. सलग चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते आणि ते पाणी वाढेकर बंधूंनी ओढा अडवल्याने त्याच ठिकाणी तुंबले. त्यानंतर हे पाणी तसेच पुढे शेजारील हॉटेल राजवैभव आणि हॉटेल रॉयलसह इतर हॉटेलमध्ये घुसले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या परिसरातील हॉटेलमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे हॉटेलचालकांचे लोकांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा आरोप होत आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे नाव सांगून दमदाटी...
वाढेकर बंधूंनी एमआयडीसी, महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक यांच्या जागेवर अतिक्रमण करत सहा महिन्यांपूर्वी पेढे विक्री केंद्र व हॉटेल सुरू केले आहे. त्यावेळी करण्यात आलेल्या मोजणीत अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एमआयडीसीने अतिक्रमण काढण्याचे सूचना दिल्या होत्या. तसेच महामार्गावर पार्किंग करू नये याबाबतही सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही अजूनही अतिक्रमण तसेच असून महामार्गावर पार्किंग रोजच सुरूच असते. वाढेकरबंधू सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे नाव घेत स्थानिकांना दमदाटी करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
"वाढेकरबंधूंनी नैसर्गिक ओढ्यावर अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे हॉटेलांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करून ओढा पूर्ववत करावा आणि वाढेकरबंधूकडून स्थानिक हॉटेल चालकांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी."- प्रवीण इंगळे, स्थानिक ग्रामस्थ, वराडे