सातारा : सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात सध्या पावसाचा जोर असून पावसाने ओढे नाले वाहू लागले आहेत. परळी खोऱ्यातील उरमोडी धरणाच्या पलीकडे असलेल्या कुरळबाजी गावच्या डोंगरावर वन हद्दीतील मातीचा भराव तसेच निलगिरीची झाडे उन्मळून पडली आहेत. येथील मातीचा भराव वन हद्दीच्या खाली असलेल्या शेतकऱ्यांच्या रानात येऊ लागला आहे यामुळे शेतीचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मे महिन्याचा अवकाळी पाऊस तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाचा जोर असल्याने या परिसरात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हा डोंगर खचत असल्यामुळे कुरळबाजी येथील वन हद्दीच्या खाली क्षेत्र असलेले जगन्नाथ कुरळे शंकर कुरळे आनंद कुरळे यांच्या शेतीत मातीचा भराव वाहून येऊ लागला आहे. सततच्या पावसामुळे या परिसरातील पेरण्याही खोळंबल्या आहेत. मात्र परिसरात हिरवाई ने डोंगर झाले असल्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे.