सातारा : पुढारी वृत्तसेवा
पावसामुळे शेतातील लावणीच्या पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने आवक घटली आहे. त्याचा परिणाम किरकोळ बाजारातील दरावर झाला आहे. आमटीसह सर्वच जेवणाला चव देणार्या व त्याची लज्जत वाढवणार्या कोथिंबिरीच्या पेंडीने पन्नाशी पार केली आहे. त्यामुळे स्वादिष्ट जेवणावर काहीसा परिणाम झाला आहे. हिरव्या मिरचीच्या दराची शंभरी मागील दोन महिन्यांपासून कायम आहे. सणासुदीच्या काळात गृहिणींना वाढत्या दराने मिरची झोंबू लागली आहे.
गेल्या दोन महिन्यामध्ये सलग पाऊस पडत होता. त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. तसेच पालेभाज्यांची उगवणच व्यवस्थित झाली नाही. काही पालेभाज्या अतिपावसामुळे जागेवरच सडून गेल्या. परिणामी सध्या जिल्ह्यात सर्वत्र भाज्यांची चणचण भासत असून त्यांचे दर वाढले आहेत. विशेषतः पालेभाज्यांची आवक घटली आहे. चाकवत, तांदळीची भाजीही मिळणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर कोथिंबीर व हिरवी मिरचीदेखील महागली आहे. घरोघरी पोह्यांपासून वरणापर्यंत फोडणीवर कोथिंबीर लागतेच. साध्या आमटीलाही चव आणणार्या कोथिंबिरीचे दर कडाडले आहेत. कोथिंबीर पेंडीचा दर पन्नास रुपयांच्या पुढे गेला आहे. एरवी पावसाळ्याच्या मध्यावर भाज्यांच्या दरात नेहमीच वाढ होते. मात्र, यावर्षी सलग पावसामुळे पालेभाज्यांची आवक मंदावली आहे. त्यामुळे भाजी मंडई खरेदीचे गणित कोलमडले आहे.
शेपूची पेंडी 30 रुपयांना विकली जात आहे. पोकळा, तांदळीचा तुटवडा भासत आहे. मेथीची पेंडी 40 रुपये विकली जात आहे. नाष्ट्यापासून हरएक पदार्थासाठी हिरव्या मिरचीचा वापर होतो. श्रावण व आता गणेशोत्सवामुळे शाकाहाराला प्राधान्य असल्याने हिरव्या मिरचीची मागणी वाढली आहे. कष्टकरी वर्गात भाजी ऐवजी बर्याचदा मिरचीचा ठेचा खाल्ला जातो. मात्र, दरवाढीमुळे कष्टकरी वर्गासह सर्वसामान्यांना हिरवी मिरची तिखट झाली आहे.
फळभाज्यांचे दर स्थिर असले तरी कांदा व लसणाचे दर गगनाला भिडू लागले आहेत. कोणत्याही भाजीला फोडणीशिवाय चव येत नाही. त्यामुळे कांदा व लसून स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक बनला आहे. कांद्याने पन्नाशी पार केली असून, लसूण 300 ते 400 रुपये किलो दराने विकला जात आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पै-पाहुण्यांचा राबता असतानाच कांदा लसणाच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक तडका बसत आहे.