विटा : विट्याच्या दीडशे वर्षांहून अधिक परंपरेच्या दसरा पालखी शर्यतीत सुळेवाडीच्या पालखीने बाजी मारली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. ही शर्यत पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती. हा दसरा पालखीचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील भाविकांसह तालुक्यातील देशभर पसरलेले गलाई व्यवासायिक उपस्थित होते.
येथील गांधी चौकातील काळेश्वर मंदिर ते खानापूर नाक्यावरील शिलंगण मैदाना पर्यंतच्या रस्त्यावर हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. शर्यत मार्गाच्या शेजारीच्या इमारतींवर उभारून शेकडो लोकांनी शर्यतीचा आनंद घेतला. पालखी शर्यतीच्या निमित्ताने शहरात पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
विजयादशमी दसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.२) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास शर्यत सुरू झाली. तत्पूर्वी येथील श्री भैरवनाथ मंदिराजवळील मैदानात विटा येथील रेवण सिद्ध आणि श्रीक्षेत्र मुळस्थानच्या श्री रेवण सिद्ध नाथाच्या पालख्या आल्या. यावेळी विट्या चे ग्रामदैवत भैरवनाथ, सिद्धनाथ, म्हसवड सिद्धनाथ देवाच्या पालख्या या ठिकाणी दाखल झाल्या. काळेश्वर मंदिरा जवळ एकत्रित सर्व पालख्यांतील श्रींची आरती करण्यात आली. त्यानंतर विटा आणि मूळस्थान या दोन पालख्यांमध्ये शर्यत झाली. विशेष म्हणजे दोन्ही पालख्यांमध्ये श्री रेवणनाथ मूर्त्या विराजमान असतात.
सुरुवातीला मूळस्थानच्या पालखीला प्रथेप्रमाणे पाच पावलं पुढे जाण्याचा मान दिला. त्यानंतर शर्यत सुरू झाली. दोन्ही बाजूचे समर्थक आपआपल्या पालखी साठी धावत होते. मात्र, मूळस्थानची पालखी सुरुवाती पासूनच आघाडी घेतली, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मूळ स्थान आणि विट्याच्या पालखीत थोडे अंतर पडले. सुरुवातीपासूनच मूळस्थानची पालखी पुढे होती. पाठीमागून तितक्याच जोमाने विट्याची पालखी जात होती. मात्र, मूळस्थानची पालखी पुढे गेली. प्रत्यक्ष शिलंगण मैदानावर सुळेवाडीच्या पालखीने बाजी मारली. यावेळी 'नाथबाबाच्या नावानं चांगभलं' असा भाविकांनी जयजयकार केला. तिथे आरती झाल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम सुरू झाला.
आमदार सुहास बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, वैभव पाटील, ब्रम्हदेव पडळकर गजानन सुतार, आदी राजकीय मंडळीही सोने लुटण्यासाठी उपस्थित होती. यावेळी पोलीस प्रशासनाने अत्यंत नेटके नियोजन केले होते. जिथे दुभाजक संपतो तिथे जागोजागी बॅरॅकेट्स लावले होते. त्यामुळे पालखी शर्यत सोहळा शिस्तबद्ध पार पडला.