Smriti Mandhana Palaash Muchhal wedding cancelled
सांगली : भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि गायक-संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न मोडण्यामागील धक्कादायक कारण समोर आले आहे. स्मृतीचा बालपणीचा मित्र, अभिनेता-निर्माता विज्ञान माने याने दावा केला आहे की, पलाशने स्मृतीची फसवणूक केली असून तो दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला होता. एका प्रदर्शित न झालेल्या चित्रपटाच्या संदर्भात ४० लाख रुपयांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा माने याने केला असून, याप्रकरणी सांगली येथे तक्रार दाखल केली आहे.
या घटनेनंतर पलाश मुच्छलला स्मृतीच्या मित्रांनी मारहाण केली होती. 'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना माने याने आरोप केला की, पलाशने एका प्रदर्शित न झालेल्या चित्रपटाच्या निर्मितीच्या नावाखाली त्याची ४० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सांगली येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
माने याने सांगितले की, "मी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्नाच्या कार्यक्रमात होतो, तेव्हा तो दुसऱ्या महिलेसोबत एकाच बेडवर रंगेहात पकडला गेला. तो खूपच भयावह सीन होता, भारतीय महिला क्रिकेटपटूंनी त्याला चोप दिला. हे संपूर्ण कुटुंब 'चिंधी चोर' आहे. मला वाटले होते की तो लग्न करून सांगलीत स्थायिक होईल, पण हे सर्व माझ्यावर उलटले."
त्यांनी पुढे आरोप केला, "जेव्हा मी गेल्या महिन्यात त्याच्या आईला (अमिता मुच्छल) भेटलो, तेव्हा तिने सांगितले की चित्रपटाचे बजेट आता १.५ कोटी झाले आहे. त्यांनी मला आणखी १० लाख रुपये गुंतवण्यास सांगितले, अन्यथा पैसे परत मिळणार नाहीत अशी धमकी दिली. त्यांनी मला ब्लॅकमेल करणे आणि चित्रपटातून काढून टाकण्याची धमकी देणे सुरू केले, त्यामुळे मला तक्रार करावी लागली."
माने पुढे म्हणाले, "लग्न रद्द झाल्यानंतर कुटुंबाने मला सगळीकडून ब्लॉक केले. मला नंतर कळले की चित्रपटातील इतर कलाकारांनाही त्यांचे मानधन मिळालेले नाही. सिनेसृष्टीत दिग्दर्शक निर्मात्यांना लुटतात असे ऐकले होते, पण ही तर सरळ सरळ चोरी आहे."
पलाश मुच्छलने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, "सांगलीच्या विज्ञान माने याने केलेले आरोप पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन आहेत. माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी हे जाणीवपूर्वक केले जात आहे. माझे वकील श्रेयांश मिठाणे कायदेशीर मार्गांचा अवलंब करत असून, या प्रकरणाचा कायदेशीररित्या सामना केला जाईल."
पलाश आणि स्मृती २३ नोव्हेंबर २०२५ रोजी विवाहबंधनात अडकणार होते. मात्र, तिच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करावे लागल्यामुळे शेवटच्या क्षणी लग्न थांबवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पलाशलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लग्न रद्द झाल्यानंतर पलाशने स्मृतीची फसवणूक केल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पलाशचे नाव लग्नाच्या कोरिओग्राफरशी जोडले गेले होते. मात्र, संबंधित कोरिओग्राफर्स गुलनाझ आणि नंदिका द्विवेदी यांनी स्पष्ट केले की, लग्न मोडण्याशी त्यांचा कोणताही संबंध नाही. या प्रकरणावर स्मृती आणि पलाश दोघांनीही मौन पाळले होते, मात्र नंतर त्यांनी लग्न अधिकृतपणे रद्द झाल्याची घोषणा केली.