विटा येथे पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. बाबासाहेब मुळीक, शेकापचे जिल्हा संघटक कॉम्रेड ॲड. सुभाषराव पाटील, किसनराव जानकर Pudhari
सांगली

Shaktipeeth Highway | शक्तिपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार : ॲड. मुळीक

खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील हजारो एकर सुपीक व बागायती जमीन बाधित होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

Shaktipeeth Highway Land Acquisition Sangli

विटा : प्रस्तावित शक्तीपीठ द्रुतगती महामार्गामुळे खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील हजारो एकर सुपीक व बागायती जमीन बाधित होण्याची शक्यता आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती अभियान राबवणार असल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. बाबासाहेब मुळीक आणि शेकापचे जिल्हा संघटक कॉ. ॲड. सुभाषराव पाटील यांनी शुक्रवारी (दि.२४) दिली.

विटा येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, प्रस्तावित शक्तीपीठ द्रुतगती महामार्गामुळे खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील हजारो एकर सुपीक व बागायती जमीन बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात बाधित शेतकऱ्यांना माहिती देऊन जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने पवनार ते पत्रादेवी (नागपूर–गोवा) दरम्यान ‘शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग’ राज्य महामार्ग (विशेष) क्र. १० म्हणून जाहीर केला असून, जमीन अधिग्रहणाची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र या प्रकल्पामुळे खानापूर आणि कडेगावमधील शेकडो एकर जमीन संपादनाखाली जाणार आहे.

गेल्या काही वर्षांत आरफळ, ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनांमुळे या दुष्काळी भागात शेतीला पाणी मिळू लागले असून, अनेक क्षेत्रे बागायती झाली आहेत. त्यामुळे या जमिनी गमवाव्या लागण्याच्या शक्यतेमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

प्रस्तावित महामार्ग खानापूर तालुक्यातील माहुली, वलखड, चिखलहोळ, भाग्यनगर, नागेवाडी, घानवड, हिंगणगादे, विटा, भाळवणी तसेच कडेगाव तालुक्यातील नेवरी, आंबेगाव, वडीयेरायबाग, वांगी, शिरगाव, देवराष्ट्रे आणि कुंभारगाव या गावांमधून जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय, या भागात आधीच राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे जाळे अस्तित्वात असून, काही रस्त्यांचे रुंदीकरणही सुरू आहे. तसेच पुणे–बेंगळुरू ग्रीनफिल्ड महामार्गाचाही प्रस्ताव आहे. अशा परिस्थितीत आणखी एक महामार्ग या भागातून नेण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

खानापूर व कडेगाव हे परंपरेने दुष्काळी तालुके असून, शेतकऱ्यांनी कठीण परिस्थितीत शेती उभी केली आहे. सिंचन योजनांमुळे आता शेती सक्षम होत असताना बागायती जमीन महामार्गासाठी देणे परवडणारे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

“शक्तीपीठ महामार्ग या दोन तालुक्यांतून जाऊ नये,” अशी स्थानिकांची तीव्र भावना असून, बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुका अध्यक्ष किसनराव जानकर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT