सांगलीमधील असणारी धुळीची स्थिती Pudhari Photo
सांगली

धुळीने गुदमरला सांगलीचा श्वास

पुढारी वृत्तसेवा

सांगली : नंदू गुरव

सांगली दलदलीतून बाहेर पडून आता धुळीत गुदमरते आहे. सांगली आणि उपनगरातील सर्व मुख्य चौक, मुख्य रस्ते धुळीत अडकले आहेत. प्रचंड धुळीने सांगलीचा श्वास गुदमरला आहे. दम्यापासून कॅन्सरपर्यंतच्या आजारांच्या शक्यतेने सांगलीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सांगलीच्या अंगणात येऊन महापूर परत गेला, पण पुरापेक्षाही गंभीर अवस्था सध्या सुरू आहे. अर्धा तास पाऊस झाला तरी सांगलीतील प्रत्येक चौकात पाण्याची डबकी साचतात. गटारी भरून रस्त्यावरून वाहतात. पावसाने उघडीप दिली आणि कडक ऊन पडले की रस्त्यावर आलेली ही घाण आणि दलदल सुकते आणि तिचीच धूळ होते. आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असलेली ही धूळ आज संपूर्ण सांगलीभर पसरली आहे. प्रत्येक रस्त्यावरून जाताना ही धूळ घातक ठरते आहे. एखादी गाडी रस्त्यावरून गेली तरी धुळीचे लोट उठतात.

साधारणपणे जिथे पुराचे पाणी साचले होते किंवा ज्या सखल भागात पावसाचे पाणी साचते या भागात तर ही धूळ जीवघेणी बनली आहे. जुना बुधगाव रस्ता, बायपास ते पंचशीलनगर चौक, विवेकानंद चौक ते लक्ष्मी मंदिर चौक, होळकर चौक ते लक्ष्मी मंदिर चौक, हडको कॉलनीतील रस्ते, कर्नाळ रोड, सांगली औद्योगिक वसाहत, कुपवाडमधील रस्ते, उपनगरातील सर्व रस्ते धुळीत अडकले आहेत. तर यावर उपाययोजनांबाबत महापालिका करतेय का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

काळजी घ्या

धूळ म्हणजे अनेक सूक्ष्म कणांचे मिश्रण असते. वायू प्रदूषणाचे हे एक प्रमुख कारण. धुळीतील सूक्ष्मकणांचा व्यास आपल्या केसाच्या व्यासाहून काही पट कमी असतो. जगभरात एकंदर वायू प्रदूषणामुळे वर्षभरात 83 लाख व्यक्तींचा मृत्यू होतो. केवळ फुफ्फुसच नव्हे, तर शरीर निरोगी राखायचे असेल तर धुळीपासून स्वत:चे संरक्षण करा, असे आवाहन तज्ज्ञ करतात.

बारोमास धुळीत

ज्या रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य आहे, त्या रस्त्यावरची घरे तर बारोमास धुळीत अडकून पडली आहेत. रस्त्यावरच्या धुळीचे लोट दिवसरात्र या घरात घुसत आहेत. याच धुळीत खाद्यपदार्थांचे हातगाडे, हॉटेल्सही सुरू आहेत, जी आरोग्यासाठी धोकादायक आहेत. जुना बुधगाव रोड, पंचशीलनगर परिसरात रस्त्यालगत अशी खूप घरे आहेत जी वर्षांनुवर्षे धुळीचा सामना करत आहेत.

पुन्हा मास्क

कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरल आजारपासून वाचण्यासाठी आणि विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले होते. आज धुळीमुळे नागरिकांना पुन्हा मास्क वापरण्याची वेळ आली आहे. अनेक नागरिक मास्क घालूनच प्रवास करताना दिसतात.

धुळीचे कण नाकावाटे केवळ श्वासनलिका आणि वायूकोश यांच्यापर्यंतच जाऊन थांबत नाहीत, तर अतिसूक्ष्म कण हे चक्क रक्तवाहिन्यांमध्ये शिरतात आणि सर्व शरीरभर पसरू शकतात. दमा, सीओपीडी, आय. एल. डी. (इंटरस्टिसिअल लंग डिसीज) असे आजार धुळीमुळे उद्भवतात, बळावतात. इतकेच काय पण, हृदय विकार, मेंदू विकार, यकृताचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर आणि रक्ताचा कॅन्सर यासाठी धूळ हा कारणीभूत घटक असू शकतो. सतत धुळीत काम करणार्‍या व्यक्तींची आयुर्मर्यादा कमी होते.
- डॉ. अनिल मडके, छातीरोगतज्ज्ञ, सांगली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT