इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा: राजनंदिनी कौस्तुभ सरनोबत (वय २९, रा. कोळी मळा परिसर ) या विवाहितेला विहिरीत ढकलून पतीनेच तिचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पती कौस्तुभ सरनोबत याला पोलिसांनी अटक केली आहे. दाेन मुलीच झाल्याने काैस्तुभ याने हे कृत्य केल्याचे पाेलीस तपासात स्पष्ट झाले आहे. राजनंदिनी यांचा भाऊ मिलिंद भोसले यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कौस्तुभ याने राजनंदिनी यांना रविवारी पहाटे फिरायला जाण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवर बसवून घरापासून कापुसखेड हद्दीतील हनुमाननगर फाट्यानजीक नेले. तेथे मोटारसायकल लावली. तेथून पुढे १०० मीटर अंतरावर दोघेजण गेले.
कौस्तुभ याने रस्त्यापासून ३० ते ४० फूट आत असणाऱ्या विहिरीच्या कडेला राजनंदिनी यांना नेले. काठोकाठ पाण्याने भरलेल्या विहिरीत राजनंदिनी यांना कौस्तुभ याने ढकलून दिले. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर राजनंदिनी यांचा पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा बनाव कौस्तुभ याने केला होता. मात्र पाेलीस तपासात हा बनाव उघड झाला.
हेही वाचलंत का ?