विटा : पुढारी वृत्तसेवा खानापूर व आटपाडी तालुक्यांतील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता टेंभू उपसा सिंचन योजना दोन दिवसांत चालू करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीत घेतल्याची माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली आहे.
आमदार बाबर म्हणाले, सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि आटपाडी तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्यामुळे या तालुक्यात सिंचनासाठी पाण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या तालुक्यातही पुरेसा पाऊस झालेला नाही. परिणामी शेती पिकांचे विशेषतः ऊस, द्राक्ष आणि डाळिंब पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तातडीने टेंभू उपसा जलसिंचन योजना सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्याबाबत काल गुरुवारी, सायंकाळी २० जुलै कालवा सल्लागार समितीची बैठक मुंबई येथे पार पडली. यांत पुढच्या दोन दिवसात टेंभू योजनेचे पाणी सोडण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस आपल्यासह मंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, खासदार संजय पाटील, जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, दीपक चव्हाण, आमदार मकरंद पाटील, आमदार अरुण लाड, आमदार विश्वजीत कदम यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, सातारा सिंचन मंडळ, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ आणि जलसंपदा विभागातील संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
हेही वाचा :