Kharsundi Bhanamati case
आटपाडी : विज्ञानयुगात जग झेपावत असताना सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथे अंधश्रद्धेच्या अंधाऱ्या गर्तेत ढकलणारी संतापजनक घटना समोर आली आहे. कष्ट करून स्वतःचे शिक्षण पूर्ण करत, अंथरुणाला खिळलेल्या वडिलांची सेवा करणाऱ्या एका जिद्दी विद्यार्थ्याला ‘भानामती’च्या, काळ्या जादूच्या नावाखाली संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
खरसुंडीतील विराज नाना पाटील हा इयत्ता आठवी मध्ये शिकणारा विद्यार्थी ‘अन्नपूर्णा नाष्टा सेंटर’ चालवत कुटुंबाचा गाडा ओढत आहे. गेल्या तीन वर्षांपासून वडील अर्धांगवायूने आजारी असताना, शिक्षण आणि व्यवसाय यांचा समतोल साधणाऱ्या या मुलाच्या जिद्दीला गावभरातून दाद मिळत होती. मात्र, बुधवारी सकाळी त्याच्या नाष्टा सेंटरसमोर उघडकीस आलेल्या प्रकाराने सर्वांना हादरवून सोडले.
विराजच्या फोटोभोवती चार लिंबे, हळद-कुंकू, विचित्र आकृत्या आणि अघोरी तांत्रिक साहित्य मांडून कथित ‘भानामती’ करण्यात आली होती. एका प्रगतीपथावर असलेल्या मुलाच्या आयुष्याशी खेळण्याचा हा निंदनीय प्रकार पाहून संतापाची लाट उसळली आहे.
गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू असून, हा प्रकार मत्सरातून कोणत्या तरी व्यक्तीकडूनच घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विराजचा वाढता व्यवसाय, त्याची मेहनत आणि मिळणारा प्रतिसाद काहींना खटकत असल्यानेच हा काळा डाव रचल्याचे बोलले जात आहे.
राज्यात गाजत असलेल्या ‘खरात बुवा’सारख्या ढोंगी प्रवृत्तींचे कारनामे अजूनही ताजे असताना, खरसुंडीतील ही घटना समाजाला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडणारी आहे. विज्ञान, शिक्षण आणि प्रगतीच्या गप्पा मारणारा समाज अजूनही अशा अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला दिसत आहे.
“एकीकडे देश चंद्रावर झेप घेतोय आणि दुसरीकडे कष्टाने जगणाऱ्या मुलावर करणी-भानामतीचे प्रयोग होतात, ही लाजिरवाणी बाब आहे,” असे एका संतप्त ग्रामस्थाने सांगितले.
या घटनेनंतर खरसुंडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली निष्पापांवर मानसिक दबाव टाकणाऱ्यांना वेळीच आवर घालणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.