कवठेमहांकाळ : पुढारी वृत्तसेवा : दसरा मेळाव्यादिवशी रत्नागिरी-नागपूर महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे झालेल्या अपघातात शिवसेना कार्यकर्ते विवेक तेली यांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना त्यांच्या कुटूंबियांना वा-यावर सोडणार नाही. आम्ही त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहू, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार अनिल बाबर, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासह शिवसेना पदाधिका-यांनी शनिवारी (दि. २८) मृत विवेक तेली यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी ते बोलत होते.
सामंत म्हणाले, आम्हाला दुःख आहे की, आमचा एक कार्यकर्ता दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे येत असताना त्याचे दुःखद निधन झाले. तेली कुटुंबीयांसमवेत आम्ही आहोत. अपघातात जे जखमी झालेले आहेत. त्यांची देखील जबाबदारी आमचीच आहे. जे वाहन मेळाव्यासाठी येत होते, त्या वाहनाचेही नुकसान झालेले आहे. या सर्वांना कशी मदत करता येईल, याचे नियोजन केले आहे.
यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आकाश माने, महेंद्र चंडाळे, अमोल जाधव, संतोष भोसले, अमोल ओलेकर, धनंजय देसाई, बाळासाहेब शिंदे यांच्यासह तेली कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा