Sangli Sambhare Ganpati
मृणाल वष्ट
सांगली : सांभारे (राजहंस) घराणे हे मूळचे तासगावचे (तासगाव चिंचणी) ! मूळ घराण्यात पौरोहित्य व वैद्यकी हा व्यवसाय. तासगावचे पटवर्धन यांच्या सांगण्यावरून चिंतामणराव पटवर्धन (दुसरे) सांगली यांच्याकडे वैद्य म्हणून पाठवले. सांगलीच्या राजमाता या आबासाहेब राजहंस यांच्या औषधोपचाराने पूर्ण बर्या झाल्या, म्हणून चिंतामणराव पटवर्धन (दुसरे) यांनी आबासाहेबांना राजवैद्य ही पदवी व पंचायतन देवळातील सांबाच्या देवळाची पूजा कायमस्वरूपी देऊ केली. मूळचे असणारे सांबाची पूजा करणारे म्हणून सांभारे असे आडनाव त्यांना पडले.
राजवैद्य म्हणून राहण्यासाठी आताच्या सांभारे वाड्यातील अर्धा भाग, राजे चिंतामणराव (दुसरे) यांनी राजवैद्यांना दिला. सांगली संस्थानचा गणेशोत्सव 1895 साली सुरू झाला होता. आपणही गणेशोत्सव सुरू करावा, असे मित्रमंडळींनी त्यांना सुचवले. 1896 साली आठ फूट उंचीची बसलेली शाडू मूर्तीची गणेशमूर्ती वासुनाना घाडगे यांनी तयार केली.
दुसर्या दिवशीच्या मिरवणुकीचे प्रात्यक्षिक म्हणून गणेश चतुर्थीच्या आदल्यादिवशी रात्री गणेशमूर्ती मारुती चौकापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. पण वजन न पेलल्याने गाड्याचे चाक तुटले व मूर्तीला इजा झाली. लगेचच तट्ट्या व बांबू यापासून दुसरी गणेशमूर्ती तयार करायला सुरुवात झाली. पण दहा फूट गणेशमूर्ती तयार करण्यास दशमीची तिथी उजाडली. त्यामुळे दशमीला प्रतिष्ठापना करून अनंतचतुर्दशीला विसर्जन केले. तेव्हापासून दशमी ते अनंतचतुर्दशी असा उत्सव सुरू झाला. 1888 साली कायमस्वरूपी लाकडी मूर्ती तयार करावी, असा विचार मित्रमंडळींबरोबर सुरू होता.
पुण्याचे गोविंद सुतार आबासाहेबांकडे औषधोपचारासाठी आले होते. त्यांनी मूर्तीचे स्ट्रक्चर तयार केले. वासुनाना घाडगे यांनी कागदाचा लगदा वापरून मूर्तीला आकार दिला. चौदा फूट उंच, नऊ फूट रुंदी, दीड टन वजन असलेली गणेशमूर्ती बनवली. ती मूर्ती तयार होण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागला. 1899 साली (आता असणार्या) तिसर्या मूर्तीची पहिल्यांदा प्रतिष्ठापना झाली. सांगलीतील हे पहिले गणेशोत्सव मंडळ. 1928 साली पहिल्यांदा ट्रकवरून मिरवणूक काढण्यात आली. मंडपाची व्यवस्था सीताराम बापू तेली यांच्याकडे असे. मूर्तीची मिरवणूक सकाळी नऊ वाजता सुरू होऊन दुपारी अडीच वाजता वाड्यात परत येत असे. त्यानंतर दुपारी संगीत सभा सुरू व्हायची. त्यानंतर ते अनंतचतुर्दशीपर्यंत चोवीस तास अखंड पाच दिवस गायन सभा असे. त्यासाठी दिग्गज कलाकार येत असत.
1899 मध्ये बसवलेली मूर्ती मारुती चौकाजवळील सांभारे
वाड्यात आजही पाहायला मिळते. लोकमान्य टिळक सांगलीत
आले होते, तेव्हा ही मूर्ती पाहून त्यांनी ती पुण्याला नेण्याचा मनोदय बोलून दाखवला होता, परंतु कात्रज घाटातून नेताना अडचणी
येतील, असे वाटल्याने त्यांनी तो विचार रद्द केला. मागील वर्ष हे या गणपतीचे 125 वे वर्ष असल्यामुळे जवळजवळ 60 ते 65
वर्षांनंतर अनंतचतुर्दशीदिवशी या गणपतीची मूर्ती मिरवणुकीसाठी बाहेर काढली होती.