सांगली ः पुढारी वृत्तसेवा
मराठा समाजाचे नेते मनोज जरांग आज (गुरुवारी) जिल्ह्यात येणार आहेत. विश्रामबाग चौक ते राम मंदिर या मार्गावर पायी शांतता रॅली काढण्यात येणार आहे. त्यात जिल्ह्यातील हजारो लोक सहभागी होणार आहेत. सांगलीत राम मंदिर चौकात सभा होईल.
रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी भगवे झेंडे
सभेसाठी राम मंदिर येथे व्यासपीठ
सभेची वेळ सायंकाळी पाच वाजता
जरांगे यांचा मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचा पश्चिम महाराष्ट्रातील दुसरा टप्पा बुधवारपासून सुरू झाला. ते आठ ऑगस्टला सकाळी नऊ वाजता सोलापूरहून निघणार आहेत. ते थेट मिरज येथे दुपारी तीनच्या दरम्यान पोहोचतील. तेथे महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करून दुचाकी रॅलीने ते विश्रामबाग येथे येणार आहेत. त्या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात होणार आहे. मार्केट यार्ड, कर्मवीर भाऊराव पाटील चौक या मार्गावरून राम मंदिरअसा रॅलीचा मार्ग आहे. राममंदिर चौकात सभा होईल.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जोरदार लढा उभारला आहे. सांगलीतही दोन वेळा भव्य असे मोर्चे काढले. काही महिन्यापूर्वी जरांगे यांची येथील तरुण भारत स्टेडियमवर भव्य सभा झाली होती. रॅलीलाही मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, असा दावा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे. रॅलीसाठी डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, पद्ममाकर जगदाळे, महेश खराडे, रुपेश मोकाशी, सतीश साखळकर, शरद देशमुख, अमोल झांबरे, रोहित पाटील, प्रणिती पवार, राहुल पाटील आदी नियोजन करीत आहेत.