NCP Party Workers Meeting
विटा : राज्य सरकार विरोधी जनतेतील असंतोषाला वाट देण्यासाठी महाविकास आघाडी आणि सम विचारी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही लढविणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी दिली आहे.
येत्या दोन महिन्यांत विटा पालिकेसह सांगली जि.प., खानापूर पं. स.च्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका लढविण्यासंदर्भात खानापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आज (दि.२७) बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडी ही सर्व समविचारी पक्षांना एकत्रित घेऊन या निवडणुका ताकदीने लढविणार आहेत, असा निर्णय झाल्याची माहिती ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती देताना ॲड. मुळीक म्हणाले, यापूर्वी २०१८ व २०२३ मध्ये झालेल्या विटा बाजार समितीच्या निवडणुका प्रस्थापित नेते एकत्र झाले तरी सर्व लहान मोठ्या विरोधी पक्षांना एकत्र करून आमच्या नेतृत्वाखाली लढविल्या. यात आमच्या आघाडीला खानापूर तालुक्यात चांगली मते मिळाली होती. त्यापूर्वी २००१ मध्येही सर्व प्रस्थापित नेत्यांच्या विरुध्द विटा बाजार समितीची निवडणूक लढविली होती. या निवडणुकांमध्ये ज्या-ज्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले होते. त्या सर्व पक्ष, गट, कार्यकर्त्यांना एकत्र करून या सर्वांच्या विचाराने या निवडणुका लढवणार आहे.
सांगली जि. प.च्या आरक्षणावर आम्ही हरकती दाखल केल्या आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी निकाल होईल. तसेच विटा पालिकेच्या मतदार याद्यांवर दुबार नावे, वेगळ्या वॉर्डातील नावे अशा जवळपास दोन हजार हरकती आल्यात ३ नोव्हेंबर रोजी या मतदार याद्या अंतिम होतील.दरम्यान, आम्ही विरोधी पक्षांनी राज्यातील मतदार याद्यां बाबत १ नोव्हेंबर रोजी मुंबईत मोठा मोर्चा आयोजित केला आहे. त्यानंतरच या निवडणु कांचा निर्णय होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांचे या निवडणुकीत राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नवीन तरुण कार्यकर्त्यांना ५० टक्के जागांवर संधी देण्याचे धोरण आहे. तसेच जयंत पाटील यांनीही आढावा बैठक घेतली आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती विचारात घेता राज्य सरकार विषयी जनतेत असंतोष असून महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या लोकसभा, विधान सभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना उबाठा, शेकाप, माकप, संभाजी ब्रिगेड, रिपाई मधील काही गट यासह महाविकास आघाडीतील फुटून गेलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला, असेही ॲड. मुळीक यांनी सांगितले.
यावेळी किसनराव जानकर, संग्राम देशमुख, संतोष जाधव, महेश कुपाडे, महेश फडतरे, सर्जेराव मदने, नानासाहेब मंडलिक, सुवर्णा पाटील, अमृता कुपाडे, भूमी कदम, बाळकृष्ण यादव, श्रेयस अधिकराव पाटील, अजित जाधव, नानासाहेब पाटणकर, यशवंत साळुंखे, प्रल्हाद शिंदे, नितीन चंदन शिवे, धर्मेंद्र यादव, मनोहर चव्हाण, सतीश बाबर, आनंदराव जाधव, सयाजी माने, मुकुल पाटील, राजकुमार गायकवाड, अक्षय यादव, सचिन मेटकरी, पोपट काटकर, सचिन नलवडे, डॉ.शिवाजी गुजर, पद्माकर यादव, संतोष चव्हाण, तानाजी गुजले, सागर बेले, किसन गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.