MLA Suhas Babar meet Agriculture Minister Dattatray Bharne
विटा : खानापूर मतदारसंघातील गारपीटग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मतदार संघातील शेतीच्या झालेल्या विदारक स्थितीबाबत सविस्तर पत्र दिल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले.
सोमवारी (दि.२३) आमदार सुहास बाबर यांनी मुंबईत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. खानापूर व आटपाडी तालुक्यात गारपीटीमुळे प्रचंड शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा, डाळिंब, केळी आणि अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अंदाजे २ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा. मतदारसंघातील शेतकरी या निसर्गाच्या अवकृ पेमुळे अक्षरश: हतबल झाला आहे. त्यामुळे सरकारने मदतीचा हात द्यावा अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी केली.
खानापूर तालुक्यात खानापूर, जखिनवाडी, बेणापूर, सुलतानगादे, रामनगर, शेडगेवाडी, करंजे, मोही, धोंडेवाडी, बाणूरगड, ताडाची वाडी, कुसबावडे, हिवरे, पळशी, बलवडी खा आणि पोसेवाडी तसेच आटपाडी तालुक्यातील आटपाडी, तडवळे, तळेवाडी, पात्रेवाडी, माळेवाडी, काळेवाडी, शेटफळे, करगणी, हिवतड, भिंगेवाडी, बनपुरी, खरसुंडी, नेलकरंजी, मिटकी, बाळेवाडी, गोमेवाडी, धावडवाडी, मानेवाडी, कानकात्रेवाडी, औटेवाडी, वलवण, चिंचाळे, घरनिकी, पिंपरी बुद्रुक, पडळकरवाडी, घाणंद, झरे, विभुतवाडी, कुरुंदवाडी, गोळेवाडी, जांभुळणी आणि पारेकरवाडी या गावांना अवकाळी व गारपीटचा मोठा फटका बसला आहे.
याबाबत कृषी खात्याने अहवाल दिला आहे. तरी आपण वस्तुनिष्ठ पंचनामाचे आदेश करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई द्यावी अशी मागणी कृषिमंत्र्यांकडे केल्याचे आमदार सुहास बाबर यांनी सांगितले.