

शिवानंद क्षीरसागर
दिघंची : दिघंची व परिसरात दुधाचे उत्पादन वाढले आहे. अनेक गावांत रोज 95 हजार लिटर दुधाचे संकलन होत आहे. शेतकऱ्यांना नियमित रोख उत्पन्न मिळू लागले आहे. दिघंची व परिसरात 30 दूध संकलन केंद्रे आहेत. या भागात सध्या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून दर महिन्याला तब्बल चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. यातून केवळ स्थानिक अर्थव्यवस्थेलाच चालना मिळत नसून ग्रामीण आर्थिक सक्षमीकरणाला बळ मिळू लागले आहे.
शेतकऱ्यांना दुधाचे पैसे आठवड्याला मिळतात. त्यामुळे त्यांच्या रोजच्या खर्चासाठी तसेच शेतीखर्चासाठी तातडीने आर्थिक मदत उपलब्ध होते. त्यामुळे कर्जावर अवलंबून राहण्याची गरज कमी होते. अनेक शेतकरी या उत्पन्नाच्या जोरावर लहान-मोठ्या गरजा पार पाडू शकतात. दिघंची परिसरात काही काळात पाण्याची स्थिती चांगली झाली आहे, याचा थेट परिणाम शेतीसह दुग्ध व्यवसायावरही सकारात्मक झाला. पाण्याची उपलब्धता वाढल्याने चारा सहज उपलब्ध होऊ लागला. परिणामी, प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात एक ते दोन गाई-म्हशी पाहायला मिळतात.