सांगली: पुढारी वृत्तसेवा
सांगलीतील ओबीसी मेळाव्यात खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांच्याबध्दल जी मते मांडण्यात आली ती चुकीची माहिती मिळाल्यामुळे व्यक्त झाली आहेत. या नेत्यांच्या वक्तव्यांचा अर्थाचा अनर्थ करण्यात आला, अशी माहिती काँग्रेसमधील ओबीसी कार्यकर्ते संजय मेंढे, संतोष पाटील व इतरांनी दिली.
मेंढे म्हणाले,ओबीसी मेळाव्याचे निमंत्रण देण्यासाठी आम्ही सारेच खासदार पाटील आणि आमदार कदम यांच्याकडे गेलो होते. त्यांनी हा मेळावा सांगलीत घेण्यापेक्षा तो मुंबईत घ्या. तिथे आम्ही आंदोलकांना सारे सहकार्य करु. मुंबईत आंदोलन झाले तर मागण्यांनाही जोर येईल असे सांगितले होते. याचा अर्थ मेळावा सांगलीत घेऊ नका असे नाही, पण अर्थाचा अनर्थ करुन ओबीसी नेत्यांना चुकीची माहिती पुरवण्यात आली.
जिल्ह्यात वसंतदादांपासून पतंगरावांपर्यंत, विश्वजीत यांच्यापासून विशाल पाटील यांच्यापर्यंत आजपर्यंत कोणीही कधी जातीयवाद केला नाही. सार्यांना सोबत घेतले. ओबीसींना संधी दिली, असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विशाल कलगुटगी, विक्रम कोळेकर, कयुम पटवेगार, युसुफ मेस्त्री, तोफीक शिकलगार, प्रमोद सुर्यवंशी, धनराज सातपुते, रहिम हट्टेवार आदी उपस्थित होते.