पलूस, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत पलूस येथील कृषिनगर अंगणवाडीमधून दिलेल्या पोषण आहारात सापाचे मृत पिलू आढळले. यावरून माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम हे विधानसभेत चांगलेच आक्रमक दिसून आले. पोषण आहारात साप सापडल्याच्या प्रकरणात दोषी असणार्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.
ते म्हणाले, मंगळवारी पलूस येथील कृषिनगर अंगणवाडी क्रमांक 116 मधील पोषण आहारात मृत साप आढळून आला. माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी त्यांच्या नातवासाठी पोषण आहार घरी नेला व तो फोडला असता, त्या पिशवीत लहान आकाराचा मृत साप आढळला. यावरून सरकार किती गंभीर आहे हे दिसून येते. जर गर्भवती, लहान बालक यांना अशा प्रकारचा आहार ठेकेदार पुरवत असेल, तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे.
गर्भवती व सहा महिने ते तीन वर्षे लहान बालकांना पोषण आहार गेली अनेक वर्षे पुरवला जातो. यामध्ये याअगोदर हरभरा, तांदूळ, तूरडाळ, गहू, तिखट, मीठ, विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या. आता डाळ, तिखट, मीठ एकत्रित करून तसेच गव्हाचे पीठ, साखर एकत्रित करून नवीन ठेकेदार कंपनी देत आहे. या पोषण आहारात सापाचे पिलू सापडले. याबाबत बेजबाबदारपणे वागणार्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पोषण आहारात पक्षी, किडे, मुंग्या आढळत आहेत. शासनामार्फत पुरवला जाणारा माता-बालक पोषण आहार हा अतिशय चांगल्या प्रतीचा, स्वच्छ, निवडक दिला पाहिजे. परंतु सरकार याकडे का दुर्लक्ष करते? असा सवाल आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केला. राज्य शासनाने पूर्वीप्रमाणेच चांगला आहार द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.