सांगली : पुढारी वृत्तसेवा
अनंत चतुर्दशीअखेर महापालिका क्षेत्रात 63 हजार 128 गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी 17 हजार 84 मूर्ती कृत्रिम तलाव, कृत्रिम जलकुंडात विसर्जित करण्यात आल्या. महापालिकेकडे 1 हजार 490 मूर्ती दानस्वरुपात जमा झाल्या आहेत. सर्व गणेश भक्तांच्या सहकार्याने व प्रशासनाच्या नियोजनानुसार मूर्ती विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली.महापालिकेने सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील श्री गणेशाच्या विसर्जनासाठी सांगलीत कृष्णा घाट, श्रीशूल घाट, विष्णू घाट, स्वामी समर्थ घाट, मिरजेत कृष्णा घाट, गणेश तलाव येथे प्रशासकीय देखरेखीखाली सोय केली होती. कृत्रिम जलकुंड, मूर्तिदान केंद्रे आणि निर्माल्य जमा करण्यासाठीची व्यवस्थाही केली होती.
महापालिका क्षेत्रात एकूण 63 हजार 128 मूर्तींचे विसर्जन झाले. अनंत चतुर्दशी नदी, तलाव, विहीर आदी ठिकाणी नैसर्गिक ठिकाणी 46 हजार 44 मूर्तींचे विसर्जन झाले. कृत्रिम जलकुंडात 17 हजार 84 मूर्तींचे विसर्जन झाले. महापालिकेकडे 1 हजार 490 गणेश मूर्ती दान स्वरूपात जमा झाल्या आहेत.आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त संजीव ओहोळ, सहायक आयुक्त सहदेव कावडे, अनिस मुल्ला, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, विद्युत अभियंता अमरसिंह चव्हाण यांनी सांगली, मिरजेच्या कृष्णा नदी घाटावर तसेच विविध ठिकाणी विसर्जन व्यवस्था केली होती.
गणेश भक्तांनी निर्माल्य नदीपात्रात विसर्जित न करता निर्माल्य कुंडात जमा करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले होते. त्याला गणेश भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या निर्माल्य कुंडांमध्ये एकूण 107 टन निर्माल्य जमा झाले आहे.