Gopichand Padalkar speech Vidhan Sabha,
आटपाडी: मुंबईतील बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘डीडीएसआर ग्रुप’वर उभा ठाकलेला कोट्यवधींचा घोटाळा आता थेट सत्तेच्या दारात पोहोचला आहे. तब्बल दोन हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत जोरदार धमाका केला. या आरोपांमुळे सरकारचीही झोप उडाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सह पोलीस आयुक्तांकडून चौकशीचे आदेश देत प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
आमदात गोपीचंद पडळकर यांनी या ग्रुपवर थेट सामान्य नागरिकांच्या स्वप्नांची लूट केल्याचा आरोप केला. “घराच्या आशेवर मुंबईत आलेल्या कष्टकऱ्यांकडून फ्लॅटचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये उकळले, पण वर्षानुवर्षे त्यांना घराचे दर्शनही झाले नाही,” असा संतप्त सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यांच्या या आरोपांमुळे सत्ताधारी आणि प्रशासन दोन्हीही बचावात्मक भूमिकेत गेल्याचे चित्र दिसून आले.
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक मुद्दा समोर आला आहे. या कंपनीमागे एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याचा संबंध असल्याचा संशय व्यक्त होत असून, जीएसटी बुडवण्याच्या आरोपावरून आधीच नोटीस व दंडाची कारवाई झाल्याची माहितीही पडळकर यांनी दिली. मात्र, तो दंड अद्याप न भरल्याचे त्यांनी स्पष्ट करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या आरोपांची तीव्रता लक्षात घेत तातडीने कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी “कोणालाही वाचवले जाणार नाही,” असा कडक इशारा देत चौकशीसाठी स्वतंत्र यंत्रणा सक्रिय केली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यभरातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः आटपाडी तालुक्यातील अनेकांनी या प्रकल्पात पैसे गुंतवले असल्याने “घर मिळणार की पैसा बुडणार?” हा प्रश्न आता अधिकच तीव्र झाला आहे.आता चौकशीतून नेमकी किती ‘मोठी मासळी’ जाळ्यात अडकते आणि या कथित घोटाळ्याचा शेवट कुठे होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करताच आटपाडी तालुक्यात खळबळ उडाली आहे. आता संबंधित उद्योगपती आणि अधिकारी यांच्या कारनाम्यांची चौकशी होणार का? याबाबत चर्चा रंगली आहे.
डीडीएसआर ग्रुपच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पंच्या परवानग्या बद्दल संशय व्यक्त करत सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला असून लवकरच या घोटाळ्याचा परदाफाश होईल असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.