

मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात याने जयंत पाटील यांना रक्ताने आंघोळ घातली होती, असा खळबळजनक आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. पडळकर यांच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जयंत पाटील हे आपल्या मुलासह खरातच्या ईशान्येश्वर मंदिरात गेले होते, असा दावाही पडळकर यांनी केला आहे. पाटील यांना ज्या रक्ताने आंघोळ घातली ते रक्त नक्की कोणाचे होते, याचा छडा लागलाच पाहिजे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पडळकर यांनी केली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत.
पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या पुरोगामी प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सडकून टीका केली. पडळकर म्हणाले की, स्वतःला फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचे म्हणवणारे आणि देवधर्म मानत नसल्याचे भासवणारे पाटील गुपचूप भोंदूबाबाकडे कशासाठी गेले होते? खरातने नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय आहे, त्यामुळे जयंत पाटील यांना ज्या रक्ताने आंघोळ घातली ते रक्त नक्की कोणाचे होते, याचा छडा लागलाच पाहिजे. जयंत पाटील यांचा खरा चेहरा जनतेसमोर येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
खरातच्या गावात 40 किलोमीटरची पाण्याची पाईपलाईन नेण्यामागे जयंत पाटील यांचाच हात असल्याचा आरोप करत पडळकर म्हणाले, खरात हा जयंत पाटील यांच्या घरी पूजा करण्यासाठी येत असे, हे संपूर्ण ईश्वरपूर ला माहिती असल्याचा दावाही त्यांनी केला. गर्भवती महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशा भोंदूबाबाशी संबंध असणाऱ्या नेत्यांनी महिला अत्याचारावर बोलणे कितपत योग्य आहे, असा सवालही पडळकर यांनी विचारला.