विटा : पुढारी वृत्तसेवा : टेंभू योजनेसाठी (Tembhu Yojana Sangli) स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचे योगदान लक्षात घेता या योजनेच्या ६ व्या टप्प्याला त्यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१) विट्यात जाहीर केला. सुळेवाडी (विटा) येथे झालेल्या टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी टेंभू विस्तारीत प्रकल्पातील (Tembhu Yojana Sangli) सांगली जिल्ह्यातील तीन घटक कामांचे भूमिपूजन केले. यांत सांगली जिल्ह्या तील टप्पा क्र. ६ आणि पळशी उपसा सिंचन योजना, टप्पा क्र. ५ वितरण व्यवस्था व कामथ गुरूत्व नलिका यांचा समावेश आहे.
यावेळी शिंदे म्हणाले की, टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाच्या ७ हजार ३७० कोटी ३ लाख रुपये रकमेच्या तृतीय सुधारीत प्रशासकीय आराखड्यास राज्य शासनाकडून ५ जानेवारी रोजी मान्यता मिळाली होती. मूळ टेंभू योजनेतील सातारा जिल्ह्यातील कराड, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव व कवठेमहांकाळ तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या ७ तालुक्यातील २४० गावांतील ८० हजार ४७२ हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिता खाली आले आहे.
या करिता २२ अब्ज घन फूट इतका पाणी वापर होत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मूळ टेंभू प्रकल्पाच्या (Tembhu Yojana Sangli) लाभ क्षेत्रालगत असलेल्या परंतु सिंचन लाभापासून वंचित असणाऱ्या तसेच अंशत: सिंचनाचा लाभ मिळणाऱ्या गावांची टेंभू प्रकल्पाचा लाभ मिळावा, अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. आता टेंभू विस्तारीत योजनेसाठी सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगांव, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत तसेच सातारा जिल्ह्यातील खटाव, माण आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या आठ तालुक्यातील १०९ गावांतील ४१ हजार ३ हेक्टर सिंचन क्षेत्रा करिता वाढीव ८ अब्ज घन फूट पाणी उपलब्ध तेस सप्टेंबर २०२३ मध्ये महाराष्ट्र शासनाने अंतिम मान्यता दिलेली आहे.
टेंभू विस्तारीत योजनेतील कामांची एकूण किंमत २ हजार १२४ कोटी ५० लाख रुपये इतकी आहे. यामध्ये एकूण पाच कामांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पंपगृह व मुख्य वितरिका, लघुवितरिका यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. १ हजार ५५५ कोटी रुपये रक्कमेच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती. दरम्यान, या टेंभू योजनेच्या भूमिपूजनातून काळ्या आईचे पांग फेडण्याचा प्रयत्न केल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.
यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अधिक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता अभिनंदन हरुगडे, युवा नेते सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, तानाजी पाटील यांच्या सह अन्य पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.