रायगड : राज्यातील नगरपंचायत व नगरपालिकांमधील नगराध्यक्षांचा कालावधी आता 2.5 ऐवजी 5 वर्षे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे रायगडमधील 11 नगरपालिकांमधील नगराध्यक्षांना थेट नगराध्यक्ष पद मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, उरण, पेण, महाड, मुरुड जंजिरा, रोहा, कर्जत, माथेरान आणि श्रीवर्धन येथील निवडणुका झालेल्या नसल्याने तेथे प्रशासक राजवट आहे. तर जिल्ह्यातील पाली, पोलादपूर, खालापूर, तळा, माणगाव आणि म्हसळा या सहा नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपला असल्याने ही मुदतवाढ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाना लागू होणार की नाही हे मात्र सरकारने स्पष्ट केलेले नाही.
विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील नगरपंचायत व नगरपालिकांमधील नगराध्यक्षांचा कालावधी आता २.५ ऐवजी ५ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता विधानसभा निवडणुका झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या निवडणुका आता थेट नगराध्यक्षपदासह घेतल्या जातील. राज्यात एकीकडे २ वर्षांपासून बहुतांश नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिकांमध्ये प्रशासन राज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच न झाल्यामुळे येथील नगराध्यक्षपदाची खुर्ची रिकामी असून तो पदभारही प्रशासनाकडे आहे. त्यातच आता राज्यातील उर्वरित नगर पंचायतींमधील नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी ५ वर्षांचा करण्यात आला आहे. राज्यात अंदाजे १०५ नगर पंचायतच्या निवडणुका अडीच वर्षापूर्वी पार पडल्याने अडीच वर्षासाठी नगराध्यक्षपदावर विराजमान झाले.
मात्र, या नगराध्यक्षांचा कालावधी ऑगस्ट महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत आतापर्यंत निघणे आवश्यक होते. आता, सरकारने अडीच वर्षांचा कालावधी थेट ५ वर्षांचा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. त्यामुळे, अडीच वर्षांनी नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहणा-या उमेदवारांची मोठी निराशा झाली आहे. रायगड जिल्हयातील पाली, पोलादपूर, खालापूर, तळा, माणगाव आणि म्हसळा या सहा नगरपंचायतीच्या निवडणुका अडीच वर्षांपूर्वी झाल्या होत्या. त्या नगराध्यक्षांची मुदत संपुष्टात आलेली आहे.