रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेच्या लढ्यात अनन्यसाधारण योगदान देणार्या मराठा मिलिटरी लँडस्केप्स श्रेणीतील 12 शिवकालीन किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळणे आता दष्टिपथात आले आहे. या 12 ऐतिहासिक किल्ल्यामंध्ये पन्हाळगडासह राज्यातील 11 किल्ले आहेत. एक किल्ला तामिळनाडू राज्यातील आहे. येत्या महिनाभरात युनेस्कोची जागतिक वारसास्थळ दर्जा परीक्षण समिती भारतात येणार आहे.
रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, पन्हाळगडसह सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि खांदेरी या सागरी किल्ल्यांचा त्यात समावेश आहे. या साखळीतील बारावा किल्ला तामिळनाडू राज्यातील जिंजीचा किल्ला असल्याची माहिती शासनाच्या महाराष्ट्र राज्य गड संवर्धन समितीचे माजी सदस्य आणि ज्येष्ठ गिर्यारोहाक ऋषिकेश यादव यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.
जागतिक वारसास्थळ दर्जाच्या विविध श्रेणी आहेत. यामध्ये सह्याद्री पर्वतराजी आणि अरबी समुद्र यामधील शिवकालीन या 12 किल्ल्याचे स्थळ व्यवस्थापन अनन्यसाधारण आहे.
वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे 46 वे अधिवेशन भारतात प्रथमच दिल्ली येथे गेल्या 21 ते 31 जुलै या 10 दिवसांच्या कालावधीत झाले. या अधिवेशनात देशातील विविध राज्यातील जागतिक स्थळ दर्जा प्रस्ताव राज्यांकडून सादर करण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील मराठा मिलिटरी लँडस्केप्स श्रेणीतील या गड-किल्ल्याच्या प्रस्तावाचे सादरिकरण झाले. त्यास युनेस्कोच्या पॅनल मेंबर्सनी तत्त्वतः मान्यता दिली. तसेच या किल्ल्याच्या परीक्षणासाठी युनेस्कोची समिती पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.