रायगड : जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद रायगडच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत विविध तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 18 मे 2026 अखेर जिल्ह्यात एकूण 64 टँकर कार्यरत असून त्याद्वारे 64 गावे व 230 वाड्यांमधील 1 लाख 13 हजार 709 नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व टँकर खासगी स्वरूपातील असून शासकीय टँकर अथवा मदतीचे टँकर कार्यरत नाहीत. सर्वाधिक टंचाईग्रस्त परिस्थिती पेण तालुक्यात असून येथे 9 गावे व 76 वाड्यांसाठी 12 टँकर कार्यरत आहेत. या माध्यमातून 24 हजार 765 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. महाड तालुक्यात 14 गावे व 87 वाड्यांसाठी 9 टँकरद्वारे 22 हजार 243 नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे.
पनवेल तालुक्यात 10 गावे व 8 वाड्यांसाठी 9 टँकरद्वारे 18 हजार 553 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. कर्जत तालुक्यात 3 गावे व 11 वाड्यांसाठी 8 टँकर, खालापूर तालुक्यात 5 गावे व 9 वाड्यांसाठी 6 टँकर, तर माणगाव तालुक्यात 4 गावे व 15 वाड्यांसाठी 5 टँकर कार्यरत आहेत.
याशिवाय अलिबाग तालुक्यात 4 गावे, उरण तालुक्यात 4 वाड्या, सुधागड-पाली तालुक्यात 2 वाड्या, रोहा तालुक्यात 3 गावे, पोलादपूर तालुक्यात 5 गावे व 14 वाड्या, म्हसळा तालुक्यात 6 गावे व 1 वाडी, तसेच श्रीवर्धन तालुक्यात 1 गाव व 3 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेकडून पाणीटंचाईग्रस्त भागांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यन, जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने तब्बल 9 कोटी 30 लाख रुपयांचा संभाव्य कृती आराखडा तयार केला असला, तरी अनेक गावांमध्ये आजही महिलांच्या डोक्यावर पाण्याचे हंडे दिसत आहेत. जिल्ह्यात यंदा तीन हजार मिमीपेक्षा जास्त पाऊस होऊनही जानेवारीनंतर पाण्याची टंचाई जाणवू लागली.
टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहिरी खोल करणे, गाळ काढणे, नवीन विंधन विहिरी घेणे तसेच नळ पाणी योजनांची विशेष दुरुस्ती अशा उपाययोजनांसाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक गावांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
जिल्ह्यामध्ये यंदा समाधानकारक पाऊस पडला. तीन हजार मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडला. धरणे, नदी, तलाव पाण्याने तुडूंब भरले. जिल्हा परिषदेसह वेगवेगळ्या विभागामार्फत जलजीवन योजनांसह अन्य पाण्याच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र तरीदेखील पाण्याची टंचाई निर्माण होते.
पाण्यासाठी अनेक गावांतील नागरिकांना वणवण करावी लागतेे. म्हणूनच पाण्याचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई संभाव्य आराखडा तयार केला आहे. ऑक्टोबर 2025 ते जून 2026 या कालावधीसाठी नऊ कोटी 30 लाख 50 हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.
खाजगी टँकरने पाणीपुरवठा
जिल्ह्यातील सर्व टँकर खासगी स्वरूपातील असून शासकीय टँकर अथवा मदतीचे टँकर कार्यरत नाहीत. सर्वाधिक टंचाईग्रस्त परिस्थिती पेण तालुक्यात असून येथे 9 गावे व 76 वाड्यांसाठी 12 टँकर कार्यरत आहेत. या माध्यमातून 24 हजार 765 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.