रायगड: राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी 18 जूनला मतदान होणार आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार (शिवसेना ठाकरे गट) सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.
यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. या सर्व घडामोडींनंतर बाळ माने यांनी एक त्यांच्या सोशल मीडियावर एक स्टेटस शेअर केले आहे. त्यांच्या या स्टेटसवरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी काल 4 जून रोजी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत वेगवान घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळाले. त्यातच रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी थेट भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे ठाकरे गटात मोठा राजकीय भूकंप झाला.
संपूर्ण हायव्होल्टेज ड्रामावर बाळ माने यांनी अद्याप कोणतीही अधिकृत पत्रकार परिषद घेतलेली नाही. मात्र, पक्षातून झालेल्या हकालपट्टीनंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी आपल्या सोशल मीडिया स्टेटसवरून अत्यंत सूचक आणि मार्मिक पोस्ट ठेवल्या आहेत. त्यांच्या या व्हॉट्सॲप स्टेटसची संपूर्ण कोकणात चर्चा पाहायला मिळत आहे.
संशय, प्रेम आणि विश्वासावर सूचक भाष्य
बाळ माने यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर एक अत्यंत मार्मिक संदेश पोस्ट केला आहे. त्यात ते म्हणाले, मनाच्या ज्या दरवाज्यातून संशय आत प्रवेश करतो त्याचवेळी त्या दरवाजातून प्रेम आणि विश्वास दोघेही बाहेर पडतात. शुभ दिवस.ठर्शींशपसश ळी र्क्षीीीं र ुरीींश ेष ींळाश, असे बाळ माने यांनी म्हटले आहे.
बदला घेणे हा केवळ वेळेचा अपव्यय आहे, असे सूचक विधान बाळ माने यांनी केले आहे. यामुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे.या राजकीय स्टेटसव्यतिरिक्त बाळ माने यांनी आपल्या दुसऱ्या एका स्टेटसच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (श्रीगुरुजी) यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. बाळ माने हे मूळ भाजपचे नेते आहेत. त्यामुळे ते पुन्हा मूळ विचारांकडे म्हणजे भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याचे बोललं जात आहे.