उरण : राजकुमार भगत
उरण तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गणांसाठी राजकीय आखाडा सज्ज झाला आहे. सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात ही लढत अत्यंत चुरशीची होणार असून, फोडाफोडीचे राजकारण आणि बदललेल्या निष्ठांमुळे या निवडणुकीत कुणाचे पारडे जड राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
तालुक्यात एकूण 1,08,520 मतदार असून, यंदा महिला मतदारांनी पुरुषांना मागे टाकले आहे.यामध्ये महिला मतदार: 55,645 तर पुरुष मतदार: 52,873 अशी आहेत. विशेषतः चिरनेर सारख्या मोठ्या गटात महिलांची संख्या अधिक असल्याने, महिलांचे प्रश्न आणि त्यांचा कौल विजयासाठी निर्णायक ठरणार आहे.
उरणमध्ये शेकाप, शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांची आघाडी भाजपसमोर मोठे आव्हान उभे करत आहे. तर दुसरीकडे, शिंदे गट आणि अपक्ष उमेदवारांमुळे अनेक ठिकाणी मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. जुन्या पराभवांचा वचपा काढण्यासाठी आणि गड राखण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. या निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाला मिळणार? हे लवकरच स्पष्ट होईल.
अशा आहेत लढती
चिरनेर गट : हा तालुक्यातील सर्वात मोठा (33,020 मतदार) गट आहे.या गटात भाजपचे देवेंद्र पाटील आणि आघाडीचे अविनाश ठाकूर यांच्यात थेट लढत होत आहे. या गटातील आवरे गणातून आघाडीच्या सुषमा गावंड यांच्या विरोधात भाजपाच्या समिधा म्हात्रे यांच्यात लढत होणार आहे. चिरनेर गणात शिवसेनेच्या कविता पाटील आणि भाजपच्या साक्षी सुजित पाटील यांच्यात लढत होत आहे.
जासई गट : जासई गटातून यावेळी आघाडीने डॉ. मनीष पाटील यांच्याविरोधात भाजपचे जे. डी. जोशी उभे आहेत. या गटातील पं.स.च्या विंधणे गणातून यावेळी ज्योत्सना पाटील (भाजप) ,प्रियंका मढवी ( शेकाप आघाडी) . तर जासई गणातून मनिषा घरत भाजप,निर्मला घरत शेकाप अशी लढत होणार आहे. नवघर गणातून यावेळी भाजपतर्फे प्रभावती भोईर विरुद्ध प्रेरणा पाटील अशी थेट लढत होत आहे. नवघर गणातून हरेश भोईर (भाजप) आणि रजनीकांत पाटील (राष्ट्रवादी) परेश ठाकूर तर काँग्रेसचे रजनिकांत पाटील यांची लढत होणार आहे.
चाणजे गट : चाणजे गटातून मागील निवडणूकीत भाजपाच्या रिना घरत या विजयी झाल्या होत्या. आत्ता पुन्हा त्या भाजपातर्फे निवडणूक लढवत असून या गटात आघाडीतर्फे सिद्धी कडू या निवडणूक लढत आहेत. चाणजे गणातून ात्ता येथे भाजपाचे कैलास भोईर, आघाडीतर्फे सागर कडू आणि शिवसेना शिंदे गटाचे अक्षय पाटील यांच्यात निवडणूक होणार आहे. केगाव गणातून आत्ता येथे राष्ट्रवादीचे परिक्षित ठाकूर, भाजपाचे राजेंद्र ठाकूर तर शेकापचे महेश म्हात्रे अशी तिरंगी लढत होणार आहे.