जेएनपीए: उरण शहरातील अलिबाग वन विभागाच्या वापरात नसलेल्या पडक्या इमारतीत गांजा ओढणाऱ्या चौघा तरुणांना उरण पोलिसांनी नुकतेच रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे उरणमधील निर्जन व पडक्या इमारती नशेबाजांचे अड्डे बनत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3 मे रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास अलिबाग वन विभागाच्या जुन्या, पडक्या इमारतीत काही तरुण अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गोविंद केंद्रे व त्यांच्या पथकाने दुपारी साडेबाराच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी यावेळी सौरभ बिस्वनाथ प्रामाणीक, वय 30, रा. उरण कोर्ट जवळ; हर्षल विनायक भोईर, वय 24, रा. भोईरआळी, नवीन शेवा; हेमंत बबन कोळी, वय 32, रा. हनुमान कोळीवाडा, आणि जुगल लक्ष्मण पाटील, वय 23, रा. केगाव-आवेडा हे चौघेजण गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 35(3) अन्वये चौघांनाही नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.
या घटनेची नोंद 3 मे 2026 रोजी दुपारी उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याचे काम पोउपनि निलेश कोंडाळकर यांनी केले असून प्राथमिक तपास पोउपनि गोविंद केंद्रे करत आहेत.
उरण शहरात गेल्या काही महिन्यांपासून अंमली पदार्थांच्या वापराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेषतः समुद्रकिनारी असलेल्या केगाव, पिरवाड, दांडा तसेच शहरातील पडक्या इमारती, बंद पडलेले गोडाऊन व निर्जन जागा यांचा वापर नशेसाठी केला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच गांजा सेवन प्रकरणी एकावर कारवाई करण्यात आली होती. उरण हे जेएनपीटी बंदर व द्रोणागिरी नोडमुळे वेगाने विकसित होत असले तरी, येथील सामाजिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.