Uran Water Crisis pudhari photo
रायगड

Uran Water Crisis : तीव्र उन्हाळ्याने रानसई, पुनाडे धरणांनी गाठला तळ

उरण तालुक्यात पाण्याचे भीषण संकट,पावसाची लागली ओढ

पुढारी वृत्तसेवा

उरण : यावर्षी पाऊस लांबल्यामुळे उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई आणि पुनाडे या दोन्ही मुख्य धरणांनी आता तळ गाठला आहे. त्यामुळे संपूर्ण उरण परिसरात पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर रानसई धरणाची उंची वाढवणे आणि पुनाडे धरणाची गळती थांबवून साठवण क्षमता वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

केगाव आणि चाणजे या दोन ग्रामपंचायत हद्दीतील गावांना या पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसला आहे. या भागात तब्बल १२ ते १५ दिवसांआड पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी बोअरवेल आणि विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, आता विहिरींनीही तळ गाठल्याने नागरिकांवर महागड्या दराने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. तालुक्यात 'जलजीवन मिशन' अंतर्गत सुरू असलेली अनेक कामे मागील चार वर्षांपासून रखडलेली असल्याने ही टंचाई अधिकच तीव्र झाली आहे. त्यातच साठवून ठेवलेले पाणी दूषित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

उरण शहर, औद्योगिक परिसर आणि ग्रामीण भागातील २५ ग्रामपंचायती मिळून सुमारे दोन लाख लोकसंख्येला दररोज ४० एमएलडी पाण्याची आवश्यकता असते. उरण एमआयडीसी कडून मिळालेल्या माहितीनुसार "११६ फूट उंच पातळी असलेल्या रानसई धरणाची पाणीपातळी तब्बल ८२ फुटांपर्यंत खाली घसरली आहे. धरणातील मृतसाठ्याची मर्यादा ८१ फुट आहे. दोन दिवसांनंतर हा मृतसाठा देखिल संपणार आहे. सद्यस्थितीत धरणात केवळ २ ते ३ दिवस पुरेल इतकाच मृत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

त्यानंतर मात्र धरणात शिल्लक राहिलेले पाणी अतिरिक्त पंप लाऊन काढले जाणार आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी सिडकोकडून दररोज ४.५ एमएलडी पाणी घेतले जात आहे. तसेच आधीच आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात लागू करण्यात आली असून, आता कमी दाबाने पुरवठा होत असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन एमआयडीसी प्रशासनाने केले आहे.

उरण पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे यांनी सांगितले की, "तालुक्यातील रानसई, केळ्याचा माळ, चांदायली वाडी, खैरकाठी, बंगल्याची वाडी, सागाचीवाडी, मार्गाची वाडी या आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईने ग्रासले आहे.

सध्यातरी प्रशासनाकडून यातील दोन आदिवासी वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे." तालुक्यात एकूण सहा आदिवासी वाड्या, चाणजे, केगाव आणि पुनाडे धरणावर अवलंबून असलेल्या आठ गावांना या पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे.

पाणीपुरवठा करणाऱ्या दोन विद्युत पंपांपैकी एक पंप सध्या बंद आहे. यामुळे पाणीटंचाईच्या समस्येत आणखीनच भर पडली आहे. पंप दुरुस्तीसाठी जीवन प्राधिकरण विभागाला कळवण्यात आले असून, तोपर्यंत नागरिकांना या टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
ॲड. अविनाश ठाकूर, रायगड जि.प.सदस्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT