राजकुमार भगत
उरण: एकेकाळी निसर्गरम्य खाडीकिनारा, पांढरीशुभ्र मिठागरे आणि हिरव्यागार भातशेतीने नटलेला उरण तालुका आज विकासाच्या महामार्गावर धावत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, जेएनपीटी बंदर आणि प्रस्तावित तिसरी मुंबई यांसारख्या महाप्रकल्पामुळे उरण भविष्याचा केंद्रबिंदू ठरला असला, तरी या सिमेंटच्या जंगलात उरणची पारंपरिक भातशेती मात्र झपाट्याने नष्ट होत आहे.
तालुका कृषी कार्यालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, उरणचे सरासरी क्षेत्र 2309 हेक्टर असले तरी प्रत्यक्षात लागवडीखालील क्षेत्र 2241 हेक्टरवर आले आहे. विशेष म्हणजे, पश्चिम भागातील शेती पूर्णतः संपुष्टात आली असून तिथे 200 हून अधिक कंटेनर यार्ड्स आणि गोदामांचे साम्राज्य उभे राहिले आहे. सद्यस्थितीत निव्वळ पिकाखालील क्षेत्र अवघे 2000 हेक्टर उरले असून, त्यात 1600 हेक्टर भातशेती आणि 363.98 हेक्टर फळपिकांचा समावेश आहे.
एकीकडे जमिनींचे सपाटीकरण होत असताना, कृषी विभाग विविध योजनांच्या माध्यमातून शेती टिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आकडेवारीवरून दिसते.चालू हंगामासाठी 339.75 क्विंटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले असून, यात प्रामुख्याने जया आणि रत्नागिरी-8 या वाणांचा समावेश आहे.
महाबीजमार्फत बियाणे पुरवठा केला जात असून 425 मे.टन युरिया खताचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत 10 हेक्टरवर प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. तसेच मशरूम लागवड (प्रति गट 20 किलो) आणि गजेंद्र जातीच्या सुरण लागवडीसाठी (7 हेक्टर) प्रोत्साहन दिले जात आहे.
शेती परवडणारी व्हावी यासाठी कृषी विभागाने 2 कोटी 10 लाख रुपयांचे लक्षांक ठेवून भात मळणी यंत्र, कडबा कुट्टी, डिझेल पंप आणि पावर टिलर यांसारख्या अवजारांसाठी आर्थिक नियोजन केले आहे.