Umte Dam Desilting Pudhari
रायगड

Umte Dam Desilting: गाळयुक्त धरणांमुळे रायगडात पाणीटंचाईची समस्या

रायगडातील सर्वच धरणक्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, पाऊस पडूनही सारे पाणी जाते वाहून

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: पाणी संकट कमी करण्यासाठी पाणी साठवण क्षमता वाढविणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यात सरासरीपेक्षा नेहमीच पाऊस चांगला पडतो मात्र ते सर्व पाणी समुद्राला वाहून जाते. धरण असूनही त्यातून गाळ काढला जात नसल्याने त्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. या धरणातील पाण्यावर कितीतरी गावं तहान भागते.

अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाचा गाळाचा प्रश्न गेली पंचेचाळीस वर्ष प्रलंबित राहिला आहे. त्यामुळे पाऊस येईपर्यंत या धरणातील जलसाठा शिल्लक राहत नाही. दरवर्षी उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न उपस्थित होत असतो. मात्र गाळ काढण्यासाठी ठोस यंत्रणा जिल्हा परिषदेकडून लावली जात नाही. त्यामुळे लाखो नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पाणी पुरवठा होतो. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षणांमुळे धरण गाळात रुतत चालले आहे.

अलिबाग तालुक्यातील रामराज परिसरातील उमटे धरणाची निर्मिती १९७८ मध्ये करण्यात आली. धरणाची उंची ५६.४० मीटर, तर साठवण क्षमता ८७ दशलक्ष घनफूट आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत उमटे धरणाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम केले जाते. या धरणातील गाळ गेली ४५ वर्षांपासून काढलेला नाही. यामुळे ८७ दशलक्ष घनफूट असलेली धरणाची साठवण क्षमता आता ३० दशलक्ष घनफुटावर आली आहे, त्यामुळे तालुक्यातील ४७ गावे व डोंगराळ भागात राहणाऱ्या ३३आदिवासी वाड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

उमटे धरणावर लाखो नागरिकांचे पाणी जीवन आहे. गाळ न काढल्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच पाण्याची तीव्र टंचाई सुरू होते. सद्यस्थितीत आठवड्याला एक दोन दिवस पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घेऊन आर्थिक भार सोसावा लागत आहे.

आतापर्यंत या धरणावर शेकडो करोड रुपये खर्च झाला असूनही नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही आहे. गाळ काढण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाही आहे. गेली साडेतीन वर्ष जिल्हा परिषदेवर प्रशासक सत्ता होती. मात्र प्रशासकाकडूनही उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी ठोस उपाययोजना केली नाही आहे. त्यामुळे प्रशासक आणि सत्ताधारी यांच्या दुर्लक्षामुळेच धरण हे आजही गाळात रुतलेले आहे.

कंपनीकडे यंत्रसामुग्रीची मागणी

धरणातील गाळ काढण्यासाठी काही दिवसापूर्वी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे बैठक झाली. या बैठकीत कंपनीकडे सामाजिक दायित्वातून गाळ काढण्यासाठी मदतीची याचना करायचे ठरले.

त्यानुसार उसर येथील गेल कंपनीला पत्र देऊन उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामासाठी आम्हाला पैशांची मदत नकोय, आपण यंत्रसामग्री (पोकलेन, जेसीबी, डंपर) किंवा तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात यावे, अशी विनंती केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT