नेरळ : कर्जत तालुक्यातील मौजे हंबरपाडा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या डोंगर माथ्यावर वसलेल्या मौजे तुंगी गावात शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या तलावात 12 वर्षीय ओंकार उर्फ मुक्या भरत आसवले या निरागस बालकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र या तलावाच्या सुरू असलेल्या कामात प्रशासन व ठेकेदार यांच्या निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
कर्जत तालुक्यातील मौजे तुंगी गाव हे उंच डोंगर माथ्यावर वसलेले असून, गेली अनेक वर्षे तुंगी या गाव हा रस्ता, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित होते. मात्र शासनाच्या माध्यमातून अलीकडेच तुंगी या गावात वीज व रस्ता पोहोचला असून गावाची पाण्याची मुख्य असेलली गरज भागवण्यासाठी शासनामार्फत जलजीवन मिशन अंतर्गत तलावाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. तर सध्या काम सुरू असलेल्या तलावात सुमारे 15 फूट पाणी साचलेले असून, ठिकाणी खोदकामही सुरू आहे.
अशा परिस्थितीत कामाच्या ठिकाणी संबंधित प्रशासन विभागाच्या अधिकारी व ठेका प्राप्त ठेकेदाराकडून कोणतीही नागरि सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा कठडे, इशारा फलक किंवा संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आलेली नसल्यानेच या 12 वर्षीय मुलाचा जीव गेल्याची घटना घडली असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
दुपारच्या सुमारास ओंकार हा गावालगतच्या तलाव परिसरात गेला होता. तलावाजवळील निसरडी पायवाट आणि सुरक्षा कठड्याच्या अभावामुळे तो पाण्यात पडून बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संध्याकाळपर्यंत मुलगा घरी न परतल्याने कुटुंबीयांनी ओंकार याचा शोध सुरू केला, मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा काही ठावठिकाणा लागला नाही. अखेर दि. 22 फेब्रुवारी रोजी सकाळीचे सुमारास ओंकर याचा तलावातच मृतदेह आढळून आला.
या घटनेनंतर आसवले कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच हा बळी गेल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेराव घातला. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असून पुढील तपास हा नेरळ पोलीस करत आहेत.
दरम्यान, गावात शोककळा पसरली असून, प्रशासन व ठेकेदार यांच्याकडून सुरक्षा उपाययोजना केल्या गेल्या असत्या, तर एका निरागस निष्पाप 12 वर्षीय ओंकारचा बळी गेला नसता, अशी भावना तुंगी ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.