राजकुमार भगत
उरण: सध्या उन्हाळ्याचा ऋतू अंतिम टप्प्यात असला तरी बाजारात फळांचा सीझन मात्र जोरात सुरू आहे. उरण आणि चिरनेर परिसरातील डोंगर-जंगलात नैसर्गिकरित्या पिकलेला रानमेवा गोळा करून, तो हायवे लगत विकून स्थानिक आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणावर रोजगार प्राप्त झाला आहे.
अटल सेतू मुळे चिरनेर हायवेवरून कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने, या मार्गावर रानमेवा विक्रीतून आदिवासी कुटुंबांना यावर्षी चांगला आर्थिक फायदा होत आहे.
चिरनेर, द्रोणागिरी आणि आसपासच्या डोंगररांगांमधून आदिवासी बांधव पहाटेच जंगलात जाऊन ताजी काळीभोर करवंदे (डोंगराची काळी मैना), जांभळे, तोरणे, आंबे आणि फणस गोळा करून आणतात.
नैसर्गिकरित्या पिकलेली ही फळे प्रवाशांना आकर्षित करत आहेत. चिरनेर हायवेच्या कडेला हे आदिवासी बांधव लहान-लहान टोपल्या घेऊन ही फळे विकण्यासाठी बसतात. अटल सेतू सुरू झाल्यापासून चिरनेर मार्गे कोकणात आणि अलिबागकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. त्यातच शनिवार, रविवार आणि लागून येणाऱ्या सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांचा ओघ अधिक असतो
“दरवर्षी उन्हाळ्यात आम्ही जंगलातून करवंदे, जांभळे गोळा करून विकतो. आधी स्थानिक पातळीवर याला फारसा उठाव नसायचा. मात्र, आता अटल सेतूमुळे चिरनेर हायवेवरून जाणारे मुंबईचे पर्यटक गाड्या थांबवून मोठ्या आनंदाने ही फळे खरेदी करतात. यामुळे यंदा आम्हांला चार पैसे जास्त मिळत असून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगला चालला आहे.“- लक्ष्मी, कातकरी