water supply scheme Pudhari
रायगड

water supply scheme: खरसई धरण प्रकल्पातून नळ पाणीपुरवठा योजना रखडली; ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप

पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर 14 मे रोजी महत्त्वाच्या सभेचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

म्हसळा: खासदार सुनिल तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने खरसई धरण प्रकल्पातून मंजूर असलेली तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना मागील जवळपास तीन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाढत्या उन्हाळ्यामुळे गावातील विहिरी,ओढे व नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटले असून नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या स्थितीत शासन टँकरने पाणीपुरवठा करत आहे. अशा परिस्थितीत अद्यापही योजना पूर्णत्वास न गेल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा शिखर समितीच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण माणगाव कार्यालयाचे उपभियांता यांना निवेदन देत तातडीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे. समितीच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी 2026 पर्यंत योजना पूर्ण होईल असे आश्वासन संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सध्या तोंडसुरे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट असलेल्या अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून काही ठिकाणी टँकरची मागणीही पुढे येत आहे.

वाढत्या उष्णतेमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर योजना लवकर पूर्ण व्हावी, रखडलेल्या कामांचा आढावा घ्यावा तसेच पाणी प्रश्नावर उपाययोजना ठरविण्यासाठी गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजता म्हसळा येथे महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली आहे.

या सभेस तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपभियांता तसेच संबंधित ठेकेदार चंद्रकांत पाटील, आशिष शिंदे व जयवंत आवेरे उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष,माजी सभापती महादेव पाटील यांनी दिली.

दरम्यान या निवेदनाच्या प्रती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री,रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयालाही पाठविण्यात आल्या असून ग्रामस्थांना लवकरात लवकर दिलासा मिळावा अशी मागणी जोर धरत आहे.

रखडलेली कामेलागणारमार्गी

वाढत्या उष्णतेमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली असल्यानेयोजना लवकर पूर्ण व्हावी, रखडलेल्या कामांचा आढावा घ्यावा तसेच पाणी प्रश्नावर उपाययोजना ठरविण्यासाठी म्हसळा येथे महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT