जेएनपीए: अटल सेतू प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनाची प्रक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केली आहे. त्यानुसार भूसंपादनासाठी जमीन मालकांची संमती घेण्याची प्रक्रिया 27 एप्रिलपासून सुरू केली जाणार असून त्यासाठी ऑनलाइन अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे.
अटल सेतू प्रकल्पाच्या नवी मुंबई बाजूकडील प्रभाव क्षेत्रातील रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 गावांमधील सुमारे 323.44 चौ. किमी भागातील नवनगर विकास प्राधिकरण (एनटीडीए) क्षेत्रात तिसरी मुंबई वसवली जाणार आहे.
याकरिता राज्य सरकारने भूसंपादन व भूवाटप धोरण गेल्या महिन्यात 16 मार्चला जाहीर केले आहे. त्यानुसार प्रकल्पग्रस्तांना सिडको आणि एमआयडीसीच्या धोरणाप्रमाणे 22.5 टक्के विकसित भूखंडाचा परतावा, रोख भरपाई किंवा एफएसआय/टीडीआर स्वरूपात मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे पनवेल, उरण, पेण तालुक्याचे भौगोलिक, सामाजिक, आर्थिक विकासक्षेत्र रुंदावणार आहेत.मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार आहे.तसे व्यावसायिक करारही सरकारतर्फे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झालेले आहे
मुंबई 3.0 घडविताना लोककेंद्रित विकासावर भर राहील. शहर निर्मिती लोकांच्या सहभागातूनच व्हावी, या विश्वासातून जमीनमालकांना विविध पर्याय देत आहोत. या शहर निर्मितीचे यश नागरिकांच्या सहभागावर अवलंबून आहे.- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए