poladour rain
पोलादपूरमध्ये पावसाने ओलांडली 2 हजारांची सरासरी pudhari photo
रायगड

Poladpur Rain | पोलादपूरमध्ये आपत्तीचे भय कायम, पावसाने ओलांडली 2 हजारांची सरासरी

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर ः पोलादपूर तालुक्यात या वर्षीच्या हंगामात पावसाने दमदार हजेरी लावत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यात जोरदार पर्जन्यवृष्टी करत 2 हजार मीमीची सरासरी गाठत वार्षिक सरासरीच्या 58 टक्के पाऊस पडल्याने तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचे भय चालू वर्षी सुद्धा जाणवत असले तरी सुदैवाने जीवित हानी टळली आहे. 22 जुलैपर्यंत तालुक्यातील पावसाची सरासरी 2080 मी मी असल्याचे आपत्ती निवारण कक्ष तहसील कार्यालयामधून सांगण्यात आले आहे.

तालुक्यातील वाकन, कोंढवी, पोलादपूर या तीन ठिकाणी पडणार पाऊस व डोंगर भाग, घाट माथ्यावर कोसळणार्‍या सरी लक्षात घेता तालुक्यातील सरासरीच्या 58 टक्के पाऊस जुलै महिन्याच्या 24 तारखेपर्यंत झाला आहे. या वर्षी वेधशाळेने नोंदविले निर्देश लक्षात घेता या वर्षी तालुक्यात सरासरी पेक्षा 20 ते 25 टक्के पाऊस जास्त पडण्याची शक्यता वाढीस लागली आहे. तालुक्यातील आपत्तीचे भय कायम राहिले असून मुसळधार पावसात दरडींसह झाडे पडण्याच्या घटना कायम राहिल्या आहेत.

जुलै महिन्यात तालुक्यातील मौजे ओंबली येथील कृष्णा गणपत चिकणे यांच्या कच्च्या घराचे अंशतः नुकसान तसेच ज्ञानदेव गणपत चिकणे यांच्या कच्च्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. तर मौजे देवपूर येथील सुरेश बाबाजी पवार यांच्या कच्च्या घराचे व मौजे पार्ले येथील विठ्ठल गोगावले यांच्या कच्च्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे तसेच मौजे निवे येथील मोहन बापू तळेकर यांच्या घराचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. तर मौजे देवपूरवाडी येथे पावसाचे पाणी वाढल्याने काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते मात्र पावसाचे प्रमाण कमी होतात पाणी ओसरले असल्याची माहिती देण्यात आली.

पोलादपूर-महाबळेश्वर या आंबेनळी घाटात मौजे चिरेखिंड या गावाजवळ 21 जुलै रोजी दरड कोसळली होती. या पूर्वी सुद्धा या ठिकाणी मातीचा ओसरा खाली आला होता. त्याच प्रमाणे मौजे आडावळे खुर्द येथील देवजी बाळू चिकणे यांच्या घरावर झाड पडून त्यांच्या कच्च्या घराचे अंशतः नुकसान झाले होते. मौजे ओंबळी येथील बसस्थानक जवळील रस्त्यावर डोंगरावरील माती घसरून रस्त्यावर आली होती.

प्रशासन अलर्ट मोडवर

पोलादपूर तालुका प्रशासन अलर्ट मोडवर असून दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा देत आपत्ती निवारणामार्फत सर्वत्र दक्षता घेतली जात आहे. अतिवृष्टी दरम्यान कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास प्रशासन सज्ज असून या कामी तहसीलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी दीप्ती गाट, पोलीस निरीक्षक अनिल जाधव व आपत्ती निवारण कक्ष दक्ष असल्याचे दिसून आले आहे.

SCROLL FOR NEXT