संध्या पिंगळे
तळा: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीची मशागत, बी-बियाण्यांची उपलब्धता तसेच खतांची जमवाजमव यांसह पेरणीपूर्व सर्व तयारी पूर्ण केली आहे. मात्र जून महिना अर्धा संपत आला तरी अद्याप पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला असून त्याच्या नजरा आभाळाकडे खिळल्या आहेत.
अनिश्चितते मुळे पेरणी खोळंबली असून तळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागली आहे. हा पाऊस लांबल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
तालुक्यात काही भागांत केवळ ५ ते १० टक्के क्षेत्रावर धुळवड वाफ्यांची पेरणी करण्यात आली आहे. परंतु समाधानकारक आणि सातत्यपूर्ण पाऊस नसल्यामुळे बहुतांश शेतकरी पेरणी करण्यास धजावत नाहीत.
पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी चातक पक्ष्याप्रमाणे आकाशाकडे आशेने पाहत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तळा तालुक्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे.
हवामान खात्याचे तसेच विविध माध्यमांतून येणारे पावसाचे अंदाज वेगवेगळे असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. पावसाच्या आशेवर पेरणी केल्यास आणि नंतर पाऊस खंडित झाल्यास बियाणे वाया जाण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.
यामुळे उत्पादन खर्च वाढून आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या शेतकरी, नागरिक आणि व्यापारी वर्गही पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप हंगामाला गती मिळणार आहे.
अन्यथा पेरणी उशिरा होऊन त्याचा परिणाम संपूर्ण कृषी अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा आता येणाऱ्या पावसावरच टिकून आहेत. मात्र ही बाब आता शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बनली आहे.
खरीप हंगाम महत्त्वाचा
खरीप हंगाम हा येथील शेतकऱ्यांसाठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा हंगाम मानला जातो. विशेषतः मृग नक्षत्रातील पेरणी पिकांच्या वाढीसाठी पोषक मानली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या अपेक्षेने आधीच शेतांची मशागत करून सर्व तयारी पूर्ण केली होती. मात्र अपेक्षित पावसाने अद्याप हजेरी लावली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.