तळा: तळा शहरातील अनेक ठिकाणी नागरिकांच्या नळाला गढूळ पाणी येत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात काही भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून भर उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे.
तर काही ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते पाणी खाजगी पाणी विक्रेत्यांकडून विकत घेत आहेत.अंबेळी व तहसिल शेजारील धरण या दोन ठिकाणी असलेल्या नगरपंचायतीच्या बोरिंगच्या माध्यमातून तळा शहराला पाणी पुरवठा केला जातो.
गेल्या अनेक वर्षांपासून एप्रिल, मे व जून महिन्यात येत असलेली पाण्याची टंचाई याही वर्षी अधिक प्रमाणात आहे. काही ठिकाणी दोन दिवसा आड ,तीन दिवसा आड , चार दिवस आड पाणी येत असून मागील दोन, तीन दिवसांपासून गढूळ पाणी नळाला येत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
काही भागात महिलांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून तळा शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे शहरातील नागरिकांनी सांगितले. हे पाणी वापरण्यायोग्य नसल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे .गढूळ पाण्याची समस्या त्वरित मार्गी लावण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.