पोलादपूर शहर: रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त लाखो शिवभक्तांनी उपस्थिती लावली होती. मात्र, सोहळ्यानंतर परतीचा प्रवास करत असताना एक अपघात घडला. मुंबई-गोवा महामार्गावरील पार्ले गावाच्या हद्दीत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन शिवभक्त गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये कपिल दशरथ केंदळे (वय 28) आणि अविनाश रामराव सावंत (वय 44) यांचा समावेश असून, ते सातारा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच गोरक्षक समाजसेवक दीपक उतेकर, अरुण मोहिते, फैजान कुडुपकर, अमित वाडकर, नुरीभाई आणि मंगेश चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना त्वरित ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचाराची व्यवस्था केली.
जखमींपैकी एका शिवभक्ताची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी अन्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त परिसरातील बहुतांश रुग्णवाहिका सेवेत व्यस्त असल्याने घटनास्थळी तातडीने ॲम्बुलन्स उपलब्ध होऊ शकली नाही.
त्यामुळे जखमींना वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे तसेच पोलादपूर पोलीस घटनास्थळी आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.