शहापूर : राजेश जागरे
तालुक्यातील वाशाळा वनपरिक्षेत्रात अज्ञात शिकाऱ्यांनी बिबट्याची क्रूरपणे हत्या करून त्याच्या पायांचे पंजे छाटत अमानुषतेचा कळस गाठल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सुसरवाडी गाव हद्दीतील कोरड्याठाक नाल्यात मंगळवारी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला असून, या प्रकारामुळे वन्यजीवांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनअधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान बिबट्याचे पायांचे पंजे धारदार हत्याराने कापल्याचे स्पष्ट झाले. नख्या व मिशांच्या केसांबाबत असलेल्या अंधश्रद्धांमुळे शिकाऱ्यांकडून बिबट्यांची शिकार होत असल्याची चर्चा असतानाच, गस्त पथके नेमकी कुठे होती? शिकाऱ्यांचे मनोबल इतके वाढले कसे? असे तीव्र सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्याच हद्दीत असा प्रकार घडल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.