डोळखांब : दिनेश कांबळे
शहापूर तालुक्यातील जंगलांमध्ये लागलेल्या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती जळून खाक झाली असून, वन्यजीवांच्या अस्तित्वावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यात वाढत्या आगीने 85% जंगल जळाले असून नीलगायांची होरपळ वाढली आहे. आगीची भीती त्यात चारा आणि पाण्याच्या शोधात मुक्तपणे संचार करताना दिसत आहेत.
डोळखांब, कसारा, टाकीपठार, अघई, तानसा आणि खर्डी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलांचा विस्तार आहे. मात्र मार्चअखेरपर्यंत लागलेल्या आगीमुळे तब्बल 85 टक्के जंगल जळून खाक झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे वन्यजीवांना अन्न आणि पाण्याची टंचाई भासत असून, ते मोठ्या प्रमाणात स्थलांतर करताना
अलीकडेच डोळखांब परिसरातील गुंडे आणि कांबे गावादरम्यानच्या जंगलात नीलगायांचा कळप चारा व पाण्यासाठी भटकताना आढळून आला. शहापूर तालुक्यात नीलगाय, भेकर, बिबट्या तसेच विविध पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. यामध्ये बिबट्या इतर प्राण्यांची शिकार करून जगतो, तर नीलगाय आणि भेकर हे पूर्णपणे जंगलातील गवत आणि पाण्यावर अवलंबून असतात. मात्र जंगल जळाल्यामुळे या प्राण्यांचे खाद्यस्रोत संपुष्टात आले आहेत. परिणामी, वन्यजीव पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात भटकंती करत असून काही वेळा ते मानवी वस्त्यांकडेही वळत आहेत.
यामुळे शेतीचे नुकसान होण्याचे प्रकारही वाढले आहेत, ज्याचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसत आहे. एकूणच, शहापूर तालुक्यातील वणव्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत गंभीर असून, वन्यजीवांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा नैसर्गिक संपत्ती आणि जैवविविधतेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कृत्रिम पाणवठे उभारण्याची गरज वारंवार व्यक्त होत असली, तरी प्रत्यक्षात त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
वणवा रोखण्यासाठी जाळरेषा आणि प्रतिबंधात्मक उपाय तत्काळ राबवणे,वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठे उभारणे,बंधाऱ्यांची गुणवत्ता तपासून दुरुस्ती करणे,नागरिकांमध्ये जनजागृती वाढवणे वनविभागाने सतर्कता वाढवून त्वरित कारवाई करणे