

पनवेल : तळोजा परिसरातून वाहणारी कासाडी नदी पुन्हा एकदा काळसर रंगाच्या पाण्याने दूषित झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथील पर्यावरणीय स्थिती गंभीर बनली आहे. मध्य भागातून पश्चिमेकडे वाहणाऱ्या या नदीच्या पात्रात वारंवार औद्योगिक सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
नदीतील पाण्याचा रंग पूर्णपणे काळवंडल्याने या भागात प्राणवायूची पातळी मोठ्या प्रमाणात घटू लागली आहे. या प्रदूषित पाण्यामुळे नदीतील मासे व इतरजलचर जीव जवळपास नाहीसे झाल्याचे दिसून येत आहे. तर, काही ठिकाणी दुर्गंधी मोठ्या प्रमाणात वाढल्याने या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होऊ लागली आहे.याविरोधात येथील नागरिकांनी प्रदुषण नियंत्रण विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही त्यावर ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने नागरिक आता संताप व्यक्त करू लागले आहेत.
या नदीचे पाणी दिवसेंदिवस अधिक काळवंडत असतानाही संबंधित यंत्रणांकडून केवळ पाहणीचा देखावा उभा करून नदीचे पाणी काळवंडण्यामागचे खरे कारण दडवत असल्याचा आरोप आता येथील नागरिक करू लागले आहेत. नदीच्या दूषित पाण्यामुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडलीच तर, त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
कासाडी नदिच्या प्रदुषमाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
सतीश पडवळ उपप्रादेशिक अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ